पुणे – विद्यापीठे म्हणजे नुसत्या उंच उंच मनोराच्या आकर्षक इमारती नव्हेत. या इमारतींच्या आत जे सकस आणि संपन्न संस्था जीवन ऐतिहासिक काळापासून फुलत आले तसे जिवंत आणि रसरशीत संस्था जीवन म्हणजे विद्यापीठ. नवे युग हे ज्ञानाच्या उपयोजनाचे युग आहे. त्याकरिता अधिक उपयोजनाक्षम ज्ञानशाखांचा विकास आवश्यक आहे, असे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२३ व्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ.विजय खरे, विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके,आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १० विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यात नाशिकमधील अशोका सेंटर फॉर बिझनेस अॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज महाविद्यालयातील रिद्धी कलंत्री या विद्यार्थीनीला ‘द प्रेसिडेंट ऑफ इंडिया शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले.
तसेच विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेंतर्गत सन २०२२-२०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्जतमधील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राजक्ता पठाडे या विद्यार्थीनीचा श्रीमती नीलिमाताई पवार सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.