पुणे – महापालिका हद्दीत असलेला मात्र, जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेला जांभूळवाडी तलाव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे हस्तांतरीत केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत, राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेकडून तत्काळ अभिप्राय मागविण्यात आला आहे. सुमारे 150 एकरांवर हा तलाव विस्तारलेला आहे. यात, मोठ्या प्रमाणात प्रदूषण तसेच जलपर्णी वाढली आहे. हा तलाव राज्य शासनाकडे हस्तांतरीत करावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती, त्याची दखल घेत हा अभिप्राय मागविण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाच्या ताब्यात हा तलाव असला तरी त्याची स्वच्छता तसेच इतर कामे महापालिकाच करत आहे. या तलावाच्या सुशोभिकरण व विकसनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने करोनाच्या साथीपूर्वी तलाव संवर्धन योजनेतून तब्बल 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, ठेकेदाराकडून कामच सुरू करण्यात आले नाही. तसेच नंतर करोनामुळे पुढे कामच झाले नसल्याने हा निधी पुन्हा राज्य शासनाकडे परत गेला आहे.
मात्र, या तलावाच्या विकसनासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे, हा तलाव जलसंपदा विभागाच्या ताब्यातून काढून घेण्यात यावा तसेच तो महापालिकेकडे हस्तांतरीत करून तो नगरविकास विभागाच्या माध्यमातून विकसित करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत नगरविकास विभागाला आदेश दिले असून नगरविकास विभागाने महापालिकेकडून तत्काळ अभिप्राय मागविण्यात आला आहे.