पुणे – तातडीच्या दुरुस्ती कामासाठी महावितरण वीजपुरवठा बंद ठेवणार आहे. त्यामुळे महापालिकेनेही गुरुवारी (दि.10) रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केल्यानंतर महावितरणने पत्र दिले आहे. त्यानंतर महापालिकेने गुरुवारी “पाणीबंद’ आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी नियमित पाणी येणार आहे.
जुलैमध्ये झालेल्या पावसाने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर शहरातील पाणीकपात मागे घेण्यात आली होती. मात्र, त्याला एकच आठवडा झालेला असताना महावितरणने लगेचच येत्या गुरूवारी वीज बंद ठेवण्याचे पत्र पालिकेस दिले होते. पालिकेनेही विरोध न करता पाणी बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. मात्र, याप्रकरणी पुन्हा पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीबंद मागे घेण्याच्या सूचना केल्या.