पुणे – सृष्टीच्या कल्याणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांना निसर्गाप्रती संवेदनक्षम होण्याची गरज आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते भारतीयांसाठी देव होते. आपल्याला ही वैज्ञानिक समज मिळाली आहे आणि आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाला मानव आणि निसर्गाप्रती अधिक संवेदनशील बनवायला हवे, असे विचार आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. त्याप्रसंगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड होते. या वेळी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अशोक जोशी, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, सीईओ डॉ. संजय कामतेकर, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे व प्रा. शरदचंद्र दराडे पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. जी. रघुराम, डॉ. राजेंद्र सिंह, डॉ. अशोक गाडगीळ यांना भारत अस्मिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रत्येकी सव्वा लाख रूपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. डाॅ. राजेंद्र सिंह म्हणाले, शास्त्रज्ञ सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाण्याचे संकट सोडविण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्याचा आपल्या जैवविविधतेवर निश्चितच परिणाम होईल.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, अस्थिर जगात प्रत्येकजण भारताबद्दल आशावादी आहे. भारत संस्कृती आणि वारसा यांनी समृद्ध असल्याने भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतीय लोक करुणा व संवेदनशीलतेने समृद्ध आहेत. भारत अस्मिता पुरस्कार विजेते खर्या अर्थाने युवकांचे प्रतीक आहेत. तरुणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी, यासाठी लक्ष केंद्रित करण्याची शपथ घेतली पाहिजे.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, आपल्याला भवितव्याच्या कल्याणासाठी व मूल केंद्रित शिक्षण, महिला केंद्रित कुटुंब, विकासासाठी ज्ञान केंद्रित समाज आणि नवकल्पना केंद्रित भारत असावा. राहुल कराड म्हणाले, आजच्या काळात सर्व युवकांनी आपली विचारधारा म्हणजेच वसाहतवादी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा उच्चार करण्यात आपलेपणा जाणवतो.