पुणे – पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पेटवून घेऊन आत्महत्या केलेल्या सुरेश पिंगळे यांच्याकडे असलेल्या पिशवीत दोन पत्रे सापडली होती. त्यापैकी पत्रातून गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक समस्यांमुळे पिंगळे तणावाखाली असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. पिंगळे यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची शक्यता आहे.
चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी खेटे मारणाऱ्या पिंगळे यांनी बुधवारी (दि. 18) पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंगळे यांच्याकडे असलेल्या पिशवीत दोन पत्रे सापडली. त्यापैकी आठ पानी पत्रात पिंगळे यांना गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक वादातून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. कौटुंबिक वादामुळे ते तणावाखाली होते. नोकरी मिळवण्यासाठी त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, चुकीचा पत्ता दिल्याने त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले होते.
पडताळणीत पिंगळे नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीविरोधात कोथरूड, समर्थ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले होते. नामसाधर्मामुळे पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यापैकी दोन पोलीस ठाण्यातील अहवालात सुरेश पिंगळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल नसल्याचा अहवाल पाठविण्यात आला होता. कोथरूड पोलिसांकडून पडताळणी अहवाल मिळणे बाकी होते, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे, परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील आदी यावेळी उपस्थित होते. शासन निर्णयानुसार तीस दिवसांच्या कालावधीत दाखला देणे बंधनकारक आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे.