पुणे – मागील काही दिवसांपासून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे सोडण्यात येत असून, अद्यापही गोरखपूर, दानापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण “फुल्ल’ होत आहे. मात्र, परतीच्या प्रवासात अनेक ट्रेन जवळपास निम्म्या प्रवासी संख्येसह धावत असल्याचे चित्र आहे.
देशाच्या विविध भागांतून अनेक कामगार आणि त्यांचे कुटुंबीय कामासाठी स्थलांतर करतात. पुणे, पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या भागांमध्ये विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने हजारो नागरिक याठिकाणी वास्तव्यास येतात. मात्र, करोनामुळे रोजगाराच्या संधीवर बंधने आहेत. अनेकांचे रोजगाराचे मार्ग बंद झाले आहेत.
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरीतांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक नागरिक श्रमिक विशेष रेल्वेने घरी परतले होते. परंतु, यंदा मात्र नागरिकांनी मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेची मागणी देखील वाढली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून प्रवासी संख्येत काही अंशी घट झाली आहे. मात्र बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालकडे जाणारे प्रवासी अधिक आहेत. प्रामुख्याने दानापूर, भागलपूर, गोरखपूर, लखनौ आदी मार्गांवर विशेष ट्रेन्स सोडण्यात येत असून, अनेक ट्रेन्सचे वेटिंग कायम आहे. 15 मार्चपासून विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. आतापर्यंत पुण्यातून सुमारे 62 रेल्वे धावल्या असून, हजारो नागरिक रवाना झाले आहेत.