पुणे -घंटागाडी किंवा कचरा गोळा करणारे खराब गाद्या व टाकाऊ फर्निचर घेत नाहीत, म्हणून नाल्याच्या कडेला किंवा नदीकाठी टाकू नका, यासाठी पुणे महापालिकेने एक खास मोहीम 14 ऑक्टोंबरपासून प्रत्येक प्रभागात दोन ठिकाणी राबवण्याचे ठरवले आहे. या कचरा संकलन केंद्रांवर नागरिकांनी गाद्या, फर्निचर आणि इतर टाकाऊ वस्तू जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी केले आहे.
शहरात नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी मोठ्या घरांची साफसफाई केली जाते. यात गाद्या, उशा तसेच मोडलेले फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक कचरा बाहेर काढला जातो. हा कचरा महापालिकेच्या कचरा वेचकांकडून संकलित केला जात नसल्याने नागरिक गुपचूप नाले, नदीकाठ अथवा रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला टाकतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून यंदाही शहरात नवरात्री तसेच दिवाळीपूर्वी संकलन मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे.
15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार असून प्रत्येक प्रभागात दोन अशा प्रकारे 86 ठिकाणी ही सुविधा दिली जाणार आहे. या ठिकाणांची यादी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून जाहीर केली जाणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. तसेच या संकलित केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर तसेच शास्त्रोक्त पद्धतीने महापालिकेकडून विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
या तीन दिवशी विशेष मोहिमा
- 14 ऑक्टोबर – गाद्या, चिंध्या, उशा, कापडाचे साहित्य.
- 28 ऑक्टोबर – फर्निचर, देवी-देवतांचे फोटो, तसेच इतर लाकडी साहित्य.
- 5 नोव्हेंबर – सर्व प्रकारचे ई- वेस्ट.
नवरात्री, दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांकडून घराची स्वच्छता केली जाते. यावेळी निघालेल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने नागरिक हा कचरा रिकाम्या जागा, नदीकाठावर, नाल्यात टाकला जातो. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे ही मोहीम राबविली जाणार असून यावर्षी प्रत्येक प्रभागात दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. – संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन