कात्रज –“पीएमआरडीए’चे आरक्षण म्हणजे आमच्या डोक्यावर बसविलेले जाचक अटींचे भूत आहे. आमचे हक्क आम्हाला मिळाले नाहीत, तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत मतदानांवर बहिष्कार टाकू, असा इशारा नागरिकांसह मान्यवरांकडून शासनासह पालिका प्रशासनास देण्यात आला आहे.
कै. सुदामराव बाबर प्रतिष्ठान आणि गुजर-निंबाळकरवाडीसह नव्याने समाविष्ट मांगडेवाडी नागरिकांच्यावतीने प्रशासनाविरोधात नागरिकांची एकजूट करीत सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली गुजर निंबाळकरवाडी ग्रामपंचायती मागील मैदानात संघर्ष मेळावा घेण्यात आला. यावेळी सदर इशारा देण्यात आला. नमेश बाबर म्हणाले की, कात्रजच्या वाट्याला कधीही विकास आलेला नाही, विकासाकरिताचा संघर्ष संपायला हवा. कात्रजचा चौक म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. महापालिकेत समावेश झाल्यापासून 25 वर्षात उड्डाणपूल झालेला नाही. भागाला तीन आमदार दोन खासदार असूनही कायम दुर्लक्ष झाले आहे. केवळ मतासाठी नागरिकांचा वापर केला गेला. विकासासाठी संघर्ष उभा केला नाही तर असेच मागे राहू. 23 गावांच्या समावेशानंतर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी समाविष्ट गावात बैठका घेतल्या. आश्वासने दिली, पण कामे कोणीच केली नाहीत. पंधरा दिवसांमध्ये आमच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर शेवटी कात्रज चौक येथे उपोषणाला बसणार आहे.
माजी नगरसेविका अमृता बाबर म्हणाल्या की, कात्रजचा विकास होताना दिसत नाही. कात्रजलाच दुय्यम स्थान का? आम्ही कर भरत नाही का? विकासाचे तोरण बांधायचे आहे, त्यामुळे हा एल्गार याची सुरुवात आहे. तर सुनिल मांगडे यांनी अडचणी सोडवायच्या असतील तर संघटित व्हावे लागेल तरच प्रश्न मार्गी लागतील. असे म्हटले. रिंगरोड बाधित होणाऱ्या घरांना योग्य मोबदला मिळायला हवा. तर याठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरक्षणे पडली असल्याचे दिपक गुजर म्हणाले. यावेळी गणेश काळे, गणेश निंबाळकर, अर्जुन निंबाळकर, अजित निंबाळकर, सुभाष मांगडे, आदींसह नागरिक उपस्थित होते.