पुणे- शहरात वाढत्या उन्हाच्या चटक्याने पाण्याची मागणी वाढलेली असतानाच; शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हे पाणी विस्कळीत होण्याचे खापर महापालिका प्रशासनाने शहरात दर गुरूवारी ठेवण्यात येणाऱ्या “पाणी बंद’वर फोडले आहे.
शहरामध्ये काही भागांमध्ये एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्याने त्यानंतर दोन दिवस पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होऊन, सदर भागातील पाणी पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होतो व पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागतो, असा खुलासा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी केला आहे.
येथे करावी तक्रार…
नागरिकांना पाण्याबाबत तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे. त्यानुसार, 020-25501383 या क्रमांकावर सकाळी दहा ते सायंकाळी 6 या वेळेत तक्रार द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच, नागरीकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा. गाड्या धुणे, सोसायट्यांमधील जिने, पार्किंग धुणे, रस्त्यावर सडा टाकणे अशा स्वरूपाच्या कामांना पिण्याचे पाणी वापरू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
काय आहे महापालिकेचे म्हणणे…
शहराच्या कोणत्याही भागात पाणीबंद ठेवल्यास पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागतो. काही भागांमध्ये स्थानिक अडचणींमुळे (उदा: पाण्याची लाइन लिकेज किंवा लाइनमध्ये अडथळा निर्माण होणे इ.) पाणी पुरवठ्याचा दाब कमी होणे, पाणी कमी वेळ मिळणे अशा तक्रारी उद्भवतात. तसेच काही सोसायट्या किंवा इमारतींच्या नळजोडामध्ये अडथळा निर्माण होऊन त्यांचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. सद्य:स्थितीत उन्हाळा सुरू झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढून पाण्याच्या प्रेशरमध्ये घट होत आहे.