पुणे –राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांत प्राध्यापक भरती होत नाही. त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून “नेट-सेट’ पात्रताधारकांनी शिक्षक दिनी स्वत:च्या तोंडाला काळे फासले.
यावेळी पात्रताधारकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकारने प्राध्यापक भरतीचा तातडीने निर्णय न घेतल्यास, सोमवारपासून (दि.6) उपोषण करण्याचा इशारा पात्रताधारकांनी दिला.
प्राध्यापक पदभरतीवरील बंदी तत्काळ उठवावी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे (सीएचबी) मानधन प्रतिदिवस पंधराशे रुपये करावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे गेल्या 49 दिवसांपासून उच्चशिक्षण संचालनालयासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दखल घेतलेली नाही. याबाबत आतापर्यंत चर्चा झाली.
मात्र काहीच निर्णय होऊ शकला नाही. एवढे दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारकडून पात्रताधारकांबाबत कोणतीच सहानुभूती नाही. त्यामुळे सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन केले. सरकारला जागे करण्यासाठी पात्रताधारकांनी घंटानाद केल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी सांगितले.