पुणे – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गातील काही ठिकाणी त्रुटी असून, त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वेकडून या त्रुटींवर काम करून सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा अंतिम आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर आराखडा रेल्वे बोर्ड आणि पंतप्रधान कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. या मार्गाची निर्मिती मध्य रेल्वेतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे व्यवस्थापक नरेश ललवानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पेरेशनच्या (महारेल) वतीने सध्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरू आहे. त्या संदर्भातील आराखडा तयार झाला असून, तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला होता. त्यामध्ये त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी प्रस्ताव अंतिम तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेला पाठविला. या मार्गात खोडद येथील जीएमआरटीच्या काही समस्या आहेत. त्यावर अद्याप मार्ग निघालेला नाही.
दरम्यान, या मार्गाचा आराखडा आणि अन्य माहिती “महारेल’ने रेल्वे बोर्डाला सादर केली. त्यातील काही त्रुटींवर मध्य रेल्वे काम करीत आहे. मात्र, हा मार्ग मध्य रेल्वे करणार असल्याची आम्हाला कोणतीही कल्पना नसल्याचे “महारेल’कडून सांगण्यात आल.
हायस्पीडमध्येही राजकारण?
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गावर राजकीय हस्तक्षेप तर नाही ना? एका विशिष्ट भागातून रेल्वे मार्ग जावा यासाठी काहींचा अट्टाहास आहे का? मात्र या अट्टाहासामध्ये काही घरे पाडावी लागणार, पर्यायाने नागरिकांचा विरोध वाढणार. त्यामुळे हा राजकीय अट्टाहास रेल्वे अधिकाऱ्यांवर दबाव आणि प्रकल्पाचा विलंब करत आहे का? अशी चर्चा सुरू आहे.
मार्गाची वैशिष्ट्ये
- पुणे-नाशिक प्रवास अवघ्या एक तास 45 मिनिटांत
- हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, नाशिक तालुक्यातून धावणार
- विद्युतीकरण असलेला दुहेरी मार्ग
- सुरुवातीला 6 कोच जोडणार; त्यानंतर 12 ते 16 कोच.