येरवडा, दि. 12 (प्रतिनिधी) -पुणे-नगर रस्ता मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जलमय झाल्याने वाहतुकीचे तीन-तेरा झाले. इतर वेळी 10 ते 12 मिनिट 4 ते 5 किमी अंतर पार करण्यासाठी लागत असताना वाहनांना तब्बल साडेतीन तास लागले.
नगर रस्ता हा वर्दळीचा महामार्ग आहे. अनेक छोटी, मोठी, अवजड वाहने या रस्त्यावरुन जातात. अनेक पंचतारांकित हॉटेल, मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था, आयटी कंपन्या, हॉस्पिटल यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. या रस्त्यावरील बीआरटी मार्ग तसेच सुरू असलेले मेट्रोचे काम यामुळे या रस्त्यावरुन जाणे जिकरीचे झाले आहे. पाऊस झाल्यानंतर त्यात पाणी साचून वाहतूक कोंडीची भर पडते.
मुसळधार पावसात संपूर्ण नगर रस्ता, वडगावशेरी, रामवाडी, विमाननगर, खराडी, चंदननगर येथील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली होती. पावसाने संपूर्ण रस्त्यावरील सिग्नल यंत्रणाही बंद पडल्याने वाहतूक पोलिसांनाही कोंडी सोडविणे अडचणीचे झाले होते.
नगर रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. याबाबतचे काम मल:निस्सारण विभागाचे आहे. अंतर्गत पावसाळी चेंबर्सची सफाई दुरुस्तीही त्या विभागाने करायची असते. तरीही पाणी साचल्यावर क्षेत्रीय कार्यालयांतर्गतच चेंबर्सची सफाई केली जाते. – सोमनाथ बनकर, सहायक आयुक्त, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय
पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साचले होते. मुख्य रस्त्यावर आणि अंतर्गत रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने कर्मचाऱ्यांचे काम वाढले होते. अशावेळी नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे गरजे आहे. मात्र, ती पाळली जात नसल्याने कोंडीत भर पडली. – एस.डी.सोनवणे, पोलीस निरीक्षक, विमानगर वाहतूक विभाग