लोहगाव परिसरात वर्षभरापासून त्रास
आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे नागरिकांची कळकळीची विनंती
येरवडा/विश्रांतवाडी – लोहगाव विमानतळ येथे सुरू असलेल्या खडी मशीनमुळे परीसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असून याचा त्रास विद्यानगरमधील नागरिकांना होत आहे. यामुळे येथील खडी मशीन बंद करण्यास प्रशासनास सांगावे, अशी कळकळीची विनंती “ऑक्सिजन ग्रुप’च्या सदस्यांनी आमदार सुनील टिंगरे यांची भेट घेत केली. या पार्श्वभूमीवर आपण याकामी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा केला आहे. परंतु, प्रशासन याकामी गांभीर्यपूर्वक निर्णय घेत नसेल तर या विरोधात नागरिकांच्यावतीने याचीका दाखल करणार असल्याचे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.
लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाच्या कामासाठी येथे खडी मशीन उभारण्यात आली आहे. एक वर्षापासून खडी मशीनच्या धुळीचे लोट विद्यानगर, बर्माशेल भागात पसरत आहेत. धुलीकरणामुळे प्रदूषित हवेतून नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. त्यामुळे सदर खडी मशीन बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी विभागीय आयुक्त,जिल्हाधीकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
परंतु, या प्रश्नाकडे प्रशासनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रशासनाने ही मशीन बंद करावी, आमचे गाऱ्हाणे आमदारांनी शासनदरबारी प्रभावीपणे मांडावे, असे शामल जाधव यांनी म्हटले आहे. यावेळी सुभाष गायकवाड, रत्नाकर पारखी, सुरेश बेंद्रे, शामल जाधव, जयश्री बेंद्रे, मीनाक्षी गावडे, सुरेक्षा बेंद्रे,रोषणा बेंद्रे, बाळासाहेब अंबात, रमेश गावडे, प्रकाश रामगुडे, बाळासाहेब साळवी, दिलीप चव्हाण, मंगेश तिखे, बंडू गावडे आदी उपस्थित होते.
खडी मशीन बंद करण्याबाबत गेले वर्षभर आम्ही आवाज उठवीत आहोत. दिवस-रात्र खडी मशीन सुरू असल्याने धुलीकण मोठ्या प्रमाणात हवेत उडत असून यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, प्रशासन याची दखल घेत नाही. ही खडी मशीन बंद झाली नाही तर आंदोलन करू.
– सुभाष गायकवाड, अध्यक्ष, ऑक्सिजन ग्रुप