मांजरी -महापालिकेत गावांचा समावेश झाल्यानंतर प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी अपेक्षा असताना मांजरी, महादेवनगर परिसरातील नागरिकांना अद्यापही पाण्यासाठी सायकल, दुचाकीवर कॅन टाकून वणवण फिरावे लागत आहे. विशेष म्हणजे पालिकेत समाविष्ट इतर गावांत महापालिकेकडून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असताना मांजरी भागाला लोकप्रतिनिधीच नसल्याने पाणीप्रश्न कोणाकडे मांडायचा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीला सुरुवातीपासूनच महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत होता, त्याची रितसर पाणीपट्टी मनपाकडे भरली जात होती. परंतु, 1980 पासून या भागात पाणीटंचाई सुरू झाली. गेली 42 वर्षे याच प्रश्नावर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रचाराचा आणि आश्वासनाचा ठरला. यावर राजकारण करीत अनेकांनी राजकीय पदे भूषविली. परंतु, मांजरी गाव, महादेवनगर परिसराचा पाणीप्रश्न सुटला नाही. डोक्यावर हंडा घेऊन फिरणाऱ्या महिला भगिनी आता कॅन आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन पाणी मिळेल त्या नळावर दिसतात.
महापालिकेत गावाचा समावेश झाल्यामुळे आता मांजरी गाव परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी आशा होती. पालिकेने ग्रामपंचायत दफ्तर ताब्यात घेतल्यानंतरही प्रश्न मार्गी लागेल असे वाटत असताना ही आशा फोल ठरताना दिसत आहे. मांजरी, महादेवनगर परिसराला आजही आठवड्यातून एकदा पाणी येते, गेले महिनाभर तर पाणीच सोडण्यात आलेले नाही. 5 ते 10 रुपयांना 20 लि. बाटली भरून मिळते, हाच येथील लोखो कुटुंबांना काहीसा आधार आहे. परंतु, मिळणारे पाणी शुद्ध आहे का? याविषयी साशंकता आहे. परंतु, पर्यायच नसल्याने मिळेल ते पाणी घेतले जात आहे.
जलस्रोत दूषित…
महानगरपालिका हद्दीतील उरुळीदेवाची-फुरसुंगी-शेवाळेवाडी, सातववाडी-गोंधळेनगर-लक्ष्मी कॉलनी, हडपसर-साडेसतरानळी-गायरानवस्ती आणि केशवनगर येथील ओढ्यातून दूषित सांडपाणी मांजरी बुद्रुक हद्दीत सोडले जाते. याशिवाय मुंढवा जॅकवेलचे प्रक्रियाविरहित घाण पाणी कालव्यातून मांजरी बुद्रुक हद्दीतील अन्सारी फाटा, महादेवनगर, घुले वस्ती भागातून वाहते. त्यामुळे मांजरी बुद्रुक हद्दीतील खासगी व ग्रामपंचयातचे पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत खराब झाले आहेत. या मुद्द्यावर तत्कालीन सरपंच आणि सदस्यांनी आंदोलनही केले होते. आता, तर गावच पालिकेत समाविष्ठ झाल्याने या मुद्द्यावरील निर्णयच ठप्प झाला आहे.