पुणे {प्रभात वृत्तसेवा}: सहाव्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसमधून बाहेर पडलेला गट आणि जनता पक्ष ( भाजप) सत्तेवर आले. मात्र, अवघ्या तीन वर्षांतच हे सरकार कोसळले आणि देशात सातवी लोकसभा निवडणूक १९८० मध्ये झाली. या निवडणुकीपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेस आणि समाजवादी यांच्यात चुरस होती.
मात्र, त्यानंतर पुण्यात भाजपचा उदय झाला. १९८० ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ नानासाहेब गोरे यांचा पराभव करून काँग्रेसचे खासदार बनले. गाडगीळ यांनी सुमारे ३० हजार मतांनी गोरे यांचा पराभव केला.
या निवडणुकीत एकूण ७ लाख ४१ हजार ७३५ मतदार होते. त्यात सुमारे ४ लाख २३ हजार ४३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत पुण्यातून तब्बल १४ उमेदवार रिंगणात होते. त्यात गाडगीळ यांना २ लाख १५ हजार १६१ मते मिळाली, तर जनता पक्षाच्या नानासाहेब गोरे यांना १ लाख ८६ हजार ३३१ मते मिळाली.
जनता पक्षाकडून (सेक्युलर) लढलेल्या श्यामकांत दामोदर मोरे यांना ९ हजार ३५६ मिळाली. या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॉफ इंडियाने पहिल्यांदाच पुणे लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी एम. डी. शेवाळे यांनी निवडणूक लढविली. त्यांना ३,१७६ मते मिळाली. या निवडणुकीनंतर पुण्यातूनही समाजवादी पक्ष उतरतीकडे झुकला.