नवी दिल्ली – आजही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासह बाहेर जाण्यासाठी किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. गाड्यांच्या कमतरतेमुळे लोकांना लांबलचक प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागत आहे.
तिकीट कन्फर्म होण्यासाठी लोक शेवटच्या क्षणापर्यंत थांबतात. मात्र तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे त्यांना रेल्वेच्या फरशीवर, कॉरिडॉरवर, दरवाजाशेजारी बसून आणि शौचालयात प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकार ट्रेनमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे.
अलीकडेच मोदी 3.0 मध्ये पुन्हा रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये प्रतीक्षा यादीच्या त्रासातून लोकांची सुटका करण्याबरोबरच लोकांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याबाबत प्रदीर्घ सादरीकरण करण्यात आले. ही योजना प्राधान्याने वंदे भारतच्या स्लीपर ट्रेन्ससाठी वापरली जाईल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लोकांना त्यांच्या शहरात नेण्यासाठी या वर्षी १९,८३७ विशेष गाड्या चालवण्यात आल्या. भारतीय रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत अतिरिक्त ४ कोटी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले. त्यामुळे नियमित गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे बोर्डाचे सदस्य, झोन प्रमुख आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर रेल्वेमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली योजना स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हेरियंटची चाचणी सुरू करणार आहे. वंदे स्लीपरचे अंतिम काम सुरू आहे.
सध्या धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त चेअर कार आहेत. यामुळे त्यांचा वापर केवळ काही तासांच्या दिवसाच्या मार्गांपुरता मर्यादित आहे. स्लीपर व्हेरियंट लांबच्या प्रवासात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास देईल. यामुळे प्रतीक्षा यादीतून लोकांची सुटका होईल.