पुणे – आंबट गोड चवीच्या द्राक्षांची मार्केट यार्डात आवक वाढली आहे. पुण्यासह नगर, सातारा जिल्ह्यांतून ही आवक होत आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातील द्राक्षांचीच चलती आहे, अशी माहिती द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. किरकोळ बाजारात दर्जानुसार ५० ते १०० रुपये किलो भावाने द्राक्षांची विक्री होत आहे.
सध्या मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज १२ ते १५ टन द्राझांची आवक होत आहे. त्यामध्ये ७५ टक्के माल तासगाव भागातील आहे. हा हंगाम मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. दरवर्षी साधारणपणे डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. तर, नोव्हेंबरमध्ये हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत असते. सध्या द्राक्षांना पर्यटन स्थळावरून जास्त मागणी आहे. त्यामध्ये लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, वाई आणि पाचगणीचा समावेश आहे. याबरोबर उपनगर आणि पिंपरी चिंचवड शहरांतील विक्रेत्यांकडून द्राक्षांची खरेदी करण्यात येत आहे.
द्राक्षांचे दहा किलोचे दर्जानुसार भाव (रुपयांत)
सुपर सोनाका- ४०० ते ६००
तास ए गणेश- ३०० ते ४५०
माणिक चमण – ३०० ते ४५०
जंबो (काळी द्राक्षे) ३०० ते ७००