पुणे – राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने उमेदवारांना अर्ज भरता येत नव्हते. या पार्श्वभूमीवर आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑफलाइन म्हणजे पारंपरिक पद्धतीने अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळही वाढवून दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी साडेपाचपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दि. 28 नोव्हेंबर ते दि. 2 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याबाबत सुविधा प्राप्त करून दिली आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने अनेक उमेदवारांची धावपळ सुरू आहे, तर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार करून पारंपरिक पद्धतीने अर्ज भरण्यास मुदत देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार निवडणूक आयोगाने दखल घेत, कोणताही व्यक्ती उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये म्हणून संगणकीय प्रणालीबरोबरच ऑफलाइन म्हणजे पारंपरिक पद्धतीने (हस्त लिखित) उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. शुक्रवारी (दि.2) दुपारी तीनऐवजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढवून दिली आहे.
जिल्ह्यात सरपंचपदासाठी 94 अर्ज
पुणे जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत 221 ग्रामपंचायतींमधून थेट सरपंच पदासाठी 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर 731 प्रभागांमधून 1 हजार 863 सदस्य पदांसाठी 782 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली.