आळेफाटा – ओतूर (ता.जुन्नर) येथील श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला; मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केली. दरम्यान, श्री समर्थ हॉस्पीटल समोर नातेवाइकांसह नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.
डॉ. समीर कुटे यांना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे तणावपूर्ण वातावरणात झाले होते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी डॉक्टरांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर येथील जमाव पांगला. याप्रकरणी मृताच्या नातेवाइकांनी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली.
अरविंद उल्हास गाढवे (वय 31 रा. ओतूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मृत गाढवे यांचे काका सर्जेराव लिंबाजी गाढवे यांनी तक्रार दिली आहे. अरविंद उल्हास गाढवे हा दि.10 जानेवारीला घराच्या बाहेर बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याने,कुटुंबीयांनी त्याला तात्काळ ओतूर (ता.जुन्नर) येथील श्री समर्थ हॉस्पिटल या डॉ. समीर कुटे यांच्या दवाखान्यात उपचार करिता दाखल केले होते.
त्यावेळी डॉ. कुटे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना अरविंद यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याची शक्यता वर्तवली. वैद्यकीय चाचण्या करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, बुधवारी (दि. 11) रात्री 10.30 वाजता फोन आला की रुग्ण अरविंद यांचे हृदय बंद झाले असून त्यांना इलेक्ट्रीक शॉक देऊन ते पुन्हा सुरू करून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याचे सांगितले.
तर गुरूवारी (दि.12) सकाळी सात वाजता डॉ. समीर कुटे यांनी नातेवाइकांना पेशंटचे हृदय बंद पडत असल्याचे सांगितले. तसेच व्हेंटिलेटर असलेली रूग्णवाहिका बोलवून त्यामध्ये आपण त्याला दुसरे दवाखान्यात पाठवू असे डॉ. कुटे यांनी आग्रह केला.
दरम्यान, रुग्ण मृत झाला असल्याचे लक्षात आल्यावर तुम्ही आम्हाला दुसरीकडे कशाला न्यायला सांगता अशी विचारणा केली असता डॉक्टरांनी रुग्ण मृत झाला असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी दिशाभूल करून निष्काळजीपणामुळे तसेच
बेजबाबदरपणामुळे अरविंद गाढवे यांचा मृत्यू झाल्याने डॉ. कुटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.
रुग्णाची प्रकृती सुधारण्यासाठी योग्य पद्धतीने वैद्यकीय उपचार करीत असताना उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला.
डॉ.समीर कुटे, व श्री समर्थ हॉस्पिटल, ओतूर