शिक्रापूर -महावितरण विभागाने शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांना एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी केल्या जाणाऱ्या विज पुरवठ्याची बोगस व खोटी बिले बनवली. जूनच्या बिलात सरासरी 12 ते 13 कोटी युनिट जादा वापर दाखवत शेतकऱ्यांकडून वसुली सुरू केली आहे. महावितरणनेच वीज चोरी केली असल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला आहे.
याबाबत शिक्रापूर, शिरूर व रांजणगाव पोलीस स्टेशन येथे पाचंगे यांनी महावितरणविरोधात तक्रार दिली आहे. शिरूर तालुक्यात महावितरण कडून घडलेल्या प्रकाराबाबत सखोल चौकशी करून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अन्यथा पुढील आठवड्यात शेतकऱ्याना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे. पाचंगे म्हणाले, महावितरणने सप्टेंबरच्या बिलात 5 ते 6 कोटी युनिट जादा वापर दाखवून वीजचोरी केली.
डिसेंबर 2022 च्या बिलात सरासरी 4 कोटी जादा युनिट वापर दाखवून वीजचोरी करत शेतकऱ्यांची बिले काढली आहेत. यामध्ये 3 एचपी कृषी पंपाचे प्रति युनिट 2.03 रुपयांप्रमाणे सबसिडी देखील चोरली आहे. तर 5 एचपी कृषी पंपाचे व त्यापुढील सर्व एचपीचे प्रति युनिट 1.73 रुपये सबसिडी चोरली असल्याचा आरोप देखील पाचंगे यांनी शिक्रापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे रामचंद्र निंबाळकर, गणपतराव फराटे, किसान आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष ठकसेन ढवळे, लक्ष्मण भगत, बापुसाहेब काळे, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, विठ्ठल वाघ, बाबुराव दौंडकर, कासारीचे माजी उपसरपंच गोपाळ भुजबळ, चिंतामणी ढमढेरे यांसह आदी उपस्थित होते.
महावितरणने कागदोपत्री दाखवलेल्या मीटर असलेल्या कृषी ग्राहकांपैकी 90 टक्के कृषी पंपाना मीटरच नाही. मीटर रीडिंग न घेता बनावट व खोटी बिले बनवून शेतकऱ्यांनी न वापरलेल्या विजेची बिले शेतकऱ्यांच्यावर लादली जातात. अनेकदा पाण्याचा तुटवडा असताना खोटी बिले बनवून सर्वात जास्त युनिट वापर दाखवून करोडो रुपयांची लूट महावितरण करीत आहे.
कृषीपंप बंद असूनही शिरूर व शिक्रापूर महावितरणने 14 ते 15 कोटी युनिट वीज वापर दाखवलेला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी पाचंगे यांनी केली आहे. या घोटाळ्याची व भ्रष्टाचाराची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्य असल्याने राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी आयोग नेमून या घोटाळ्याची एका विशिष्ट कालावधीत ती चौकशी पूर्ण करावी.
मंगळवारपासनू अर्धनग्न आंदोलन
शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. सोमवारपर्यंत पोलिसांत दिलेल्या तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल झाला नाही तर मंगळवारपासून अर्धनग्न अवस्थेत तहसीलदार कार्यालयात उपोषण आंदोलन सुरू करणार आहे. दररोज एक वस्त्र काढून आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले.
एकाही शेतकऱ्याने बिल भरू नये
शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार महावितरणला दिला कोणी? शेतकऱ्यांनाच फक्त आठ तास वीज पुरवठ्याचा नियम का? शेतकऱ्यांनाही 24 तास वीज पुरवठा करण्यात यायलाच हवा. येत्या आठ दिवसांत महावितरणने शेतकऱ्यांना रात्रपाळीतच दिला जाणारा वीज पुरवठा बंद करुन दिवसा वीज पुरवठा करावा.
अन्यथा इतर क्षेत्रालाही दिवसा वीज पुरवठा शेतकरी होऊन देणार नाही. असे न झाल्यास एकाही शेतकऱ्याने कृषिपंपाचे वीजबिल भरू नये. नाईलाजाने आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये, असे आवाहन संजय पाचंगे व काही शेतकऱ्यांनी केले आहे.