चिंबळी -श्रीक्षेत्र देहू ते आळंदी या ्पुण्यभूमीमध्ये असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी, कुरुळी, चिंबळी, केळगाव (ता. खेड) येथील भागातून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी निर्माण झाली आहे.
चिखली, तळवडे भागातील औद्योगिक वसाहतीत ऑईल मिश्रित व सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने प्रचंड प्रदूषित इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यावर जलपर्णीचे कवच तयार झाले आहे.
या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाल्याने नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. इंद्रायणी लगत दोन्ही बाजूंनी रहदारी आहे. चिखली, तळवडे एमआयडीसीचे ऑईल मिश्रित व रहदारीचे सांडपाणी नदी पात्रात सोडले जात आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात साठवलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी निर्माण होते.
त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली जाते व रब्बी हंगामातील पिकांना यांचा फटका बसला जातो. तर काहीअंशी चिंबळी, मोशी हद्दीत असलेल्या केटी बंधाऱ्याजवळ साबणासारखा पेश निर्माण होत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली जात असल्याने आजारांचे प्रमाण वाढले जात असल्याने या परिसरात जेष्ठ नागरिक व महिला वर्ग त्रस्त झालेले चित्र पाहायला मिळत आहे.