– सचिन सुंबे
सोरतापवाडी -पुणे जिल्ह्यात हवेली तालुका सर्वात मोठा असून तो सुजलाम् सुफलाम् देखील आहे. अतिशय वेगाने विकसित होणारा तालुका म्हणून याकडे पाहिले जाते; परंतु पूर्व हवेली विकासाच्या बाबतीत मागे पडली असून येथे फक्त एखादे काम मंजूर झाले अथवा चालू झाले की श्रेय घेण्यावरून वाद लागून अनेक ठिकाणची कामे रखडली आहेत.
हवेली तालुका हा पुणे शहराच्या सर्व बाजूंनी विखुरलेला आहे. तालुक्याचे भाग्यविधाते माजी खासदार स्व. अण्णासाहेब मगर यांनी या तालुक्याच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या. त्यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, हवेली तालुक्याला डोळ्यासमोर ठेवून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाली. विखुरलेल्या तालुक्याला एकसंध ठेवण्याचे काम त्यांनी केले.
स्वच्छ व पारदर्शक कारभार, विकासाची दूरदृष्टी याला महत्त्व देऊन या संस्था नावा रूपाला आणल्या. यामुळे अण्णासाहेब मगर एवढे लोकप्रिय झाले की ते पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. नंतरच्या काळात पूर्व हवेलीसाठी कुणीही गाव पुढारी ज्येष्ठ नेते शरद पवारब व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एकत्र गेल्याचे दिसत नाही. त्यामुळे विकासाला खिळ बसली.
अनेक पुढारी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पुढाकार घेत असून इतर कार्यक्रमात एकत्र येतात. पण विकास म्हटले की, श्रेयावरुन त्यांचा वाद होतो. गाव पुढाऱ्यांच्या या गुणांमुळे हवेली तालुका व पूर्व हवेलीला वरदान ठरलेला यशवंत कारखाना बंद पडला असून 22हजार सभासदांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे. तर कामगार वर्गाचे अतोनात हाल झाले आहे. पण या प्रश्नांकडे पूर्व हवेलीतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले असून कुणीही यात एकत्र आल्याचे दिसून येत नाही.
महिला सरपंचांचे काम चांगले
श्रेयवादात न अडकता पूर्व हवेलीत महिला सरपंचांचे काम चांगले चांगले आहे. त्यामध्ये कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच गौरीताई गायकवाड यांनी122 कोटी रुपयांची कामे फक्त आणली. लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी सोय केली.
तसेच स्ट्रीट लाईट, शौचालय यांसारख्या योजना राबविल्या. सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी यांनी गावात पिण्याच्या पाण्याची योजना, महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे अशा विविध योजना राबवून या सर्व महिलांनी सक्षम असे नेतृत्व समाजासमोर ठेवले आहे.
यशवंतचे घोंगडे भिजतच
यशवंत कारखाना कोणी सुरू करायचा यासाठी श्रेयवाद चालू असून या वादात यशवंत कारखान्याची चाके रुतून बसली आहेत. या सगळ्या घडामोडीत पूर्व हवेलीला कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे. एखादे काम मग ते लोणी काळभोर येथील रामदरा रस्त्याचे असो किंवा उरुळी कांचन येथील80 कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना त्याचे श्रेय सोशल मीडियाद्वारे घेण्याचा प्रय्तन होतो.
वरिष्ठांकडून आदर्श घ्या
याबाबत विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही पक्षाचे प्रतिनिधी त्यांच्याकडे गेले तर ती योजना महत्त्वाची असल्यास त्यांना ताबडतोब मंजुरी देतात. मग वरिष्ठ नेते फक्त कामांना महत्त्व देत असुन गावागावातील पुढारी यासाठी एकत्र येऊन विकासाच्या योजना का आणत नाहीत. असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
पूर्व हवेली व हवेलीच्या विकासाच्या आड राजकारण न करता विकासकामे करावीत. आम्ही विकासकामांना गती देण्यासाठी एकत्र येण्यासाठी तयार असून विकासकामासाठी राज्यातील कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडे जाण्याची तयारी आहे.
-सनी काळभोर, माजी उपसभापती पंचायत समिती
खरोखरच पूर्व हवेलीला अस्तित्वाची गरज असून पूर्व हवेलीकडे सतत दुर्लक्ष होत आहे. मूलभूत प्रश्नसुद्धा सुटत नाहीत. विकासकामे कोणी आणले, कुठून आणले याला महत्त्व देण्यापेक्षा विकासकामांना महत्त्व दिले पाहिजे. सत्ता कुणाचीही असू देत, गावच्या सर्वांगीण विकासासाठी गटतट न करता एकत्र येणे गरजेचे आहे.
-स्वप्निल कुंजीर, शिरूर हवेली संघटक शिवसेना (ठाकरे गट)