जांबूत -आंबेगाव- शिरूर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांसह माजी सभापती देवदत्त निकम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन बिबट्याचा वाढता वावर व मानवी हल्ले यासंदर्भात चर्चा केली. शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या चारही तालुक्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वचासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याने थैमान घातलेले आहे. यात बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, कित्येक जण हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पशुधन धोक्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
मागील सहा महिन्यांत शिरूर तालुक्यातील जांबुत आणि पिंपरखेड परिसरात चार जण बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले आहेत. या चारही तालुक्यांत ऊसशेतीचे प्रमाण अधिक असल्याने मोठी लपण निर्माण होऊन बिबट्यांचे वास्तव्य वाढलेले आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे वास्तव दिसत आहे.
शेतात कामे करताना दिवसा बिबट्यांचे दर्शन होत असून शेतकऱ्यांना शेतीला सिंचनपुरवठा करण्यासाठी रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून जावे लागत आहे. यामुळे शेतकरीवर्ग भयभीत झालेला असून, घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे.
घटनांचे गांभीर्य वनविभागाने याआधी महावितरणला प्रस्ताव सादर करून निदर्शनास आणून दिलेले आहे. तरीही कोणताही ठोस निर्णय महावितरण व शासनाकडून घेतला नसल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा मागील आठवड्यात देवदत्त निकम यांनी दिला होता.
यानंतर बुधवारी (दि. 7) माजी सभापती देवदत्त निकम यांनी आपल्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. बिबट हल्ल्याच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी अनिकेत कुऱ्हाडे, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, उपसरपंच विकास वरे, शरद बोंबे, नाथा जोरी आदी उपस्थित होते.