वाई – वाई शहरासह तालुक्यात बावधन नाका येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. शासकीय जागेत अतिक्रमण केले जात आहे. वाई शहरात शांतता अबाधित रहावी, बावधन नाका दहशत मुक्त करावा, असा एल्गार वाईकरांच्यावतीने विराट मोर्चा काढून करण्यात आला. वाई तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. या मोर्चात वाई शहर व तालुक्यातील सर्व समाजातील, सर्व जातीधर्माचे नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
वाई शहरात आणि वाई तालुक्यात कायदा व सुव्यवस्था ठराविक रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्यामुळे बिघडू लागली आहे. बावधन नाका या परिसर हॉटस्पॉट बनला आहे. सर्वसामान्य नागरिक, महिला, कॉलेज युवती यांना नेहमीचा त्रास होत आहे. वाई शहरात येणार्या पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. व्यापार्यांनाही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांपासून त्रास होत असल्याने वाई शहर व तालुक्यातील सर्व धर्म, सर्व जातीतील नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात वाई येथील महागणपती मंदिरापासून झाली. हा मोर्चा आमंत्रण चौक, चित्रा टॉकीज मार्गे किसन वीर चौक मार्गे वाई पोलीस ठाण्याच्या पुढून वाई तहसीलदार कार्यालयावर मोर्चा पोहचला. शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले. अॅड. रवींद्र भोसले, काशिनाथ शेलार, विजयाताई भोसले, अनिल सावंत, अनित वनारसे, विजय ढेकाणे, निलेश सोनावणे, दीपक ननावरे, विनायक सोहनी, सुहास देशपांडे यांच्यासह अनेज मान्यवरांच्या सह्या निवेदनावर आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, वाई शहरालगत असलेल्या बावधन नाका ते बावधन रोडलगत शासकीय व खासगी जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून तसेच वाई न्यायाधीश यांच्या निवासाच्या समोर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे वास्तव करीत असलेले लोक हे सभोवतालच्या लोकाना नाहक त्रास देत आहेत. तसेच शहरातील व परिसरातील लोकांना, त्यांचे व्यवसायास त्रास देऊन शहरामध्ये दहशत निर्माण करत आहेत. शहरातून बावधन येथे जात येत असताना अनेकवेळा बेकायदेशीर अतिक्रमणामुळे लोकांना व विदयार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हे अतिक्रमण काढल्यास लोकांना होणारा त्रास संपुष्टात येणार आहे. पंधरा दिवसांचे आतमध्ये वाई शहरातील अतिक्रमणाबाबत योग्य तो निर्णय घेऊन तात्काळ कारवाई करावी व अतिक्रमण हटवावे, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.