पुणे –राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिंगरोडसाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रिंगरोडच्या कामास गती मिळाली आहे. हा रिंगरोड भोर, हवेली, मुळशी आणि मावळ या चार तालुक्यांतील 37 गावांमधून जाणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी प्राथमिक दर निश्चित करण्याचे काम सुरू आहे. यापैकी 18 गावांमधील दर निश्चित झाले असून दर निश्चित करणाऱ्या समितीने त्यास मान्यता मिळाल्यानंतर अंतिम दर सर्व्हे नंबरनिहाय जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भूसंपादन करणार असून स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम “एमएसआरडीसी’ने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता.भोर) असा आहे. तर पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. हा रिंगरोड सुमारे 68 किलोमीटर लांबीचा असणार आहे. रिंगरोडसाठी 695 हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम हाती घेतले जाणार आहे.
भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्यासाठी दर निश्चित करण्याचे काम गतीने सुरू आहे. भूसंपादनासाठी करण्यात येणाऱ्या मूल्याकंनाबाबत जिरायत, बागायती जमिनी, शेतातील झाडे, विहीर आणि घरांचा विचार करून अचूक मूल्यांकन करावे. यात कोणावरही अन्याय होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना शासनाने यापूर्वीच दिल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच रिंगरोड बाधितांना पाचपट मोबदला देणार असल्याचे जाहीर केले आहे. मोबदल्यासाठीचे दर निश्चित करताना त्या गावात अथवा परिसरात मागील तीन वर्षांत झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या आधारे दर निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.