लोणी काळभोर, (वार्ताहर)- भारतातील तंत्रज्ञानाने सध्या जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान सारख्या अंतराळ मोहीमा, जगातील सर्वांत मजबूत मिसाईल, विविध प्रकारचे ड्रोन्स बनवून आपल्या शास्त्रज्ञांनी जगाचे लक्ष आकर्षित केले आहे. भारत आता सॉफ्टवेअरसह हार्डवेअर क्षेत्रातही स्वावलंबी बनला आहे.
त्यामुळे या स्पर्धात्मक युगात आपल्याकडील लोकल तंत्रज्ञानाला प्रचंड मागणी मिळत असल्याने ते ग्लोबल व्हायला हवे, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी संचालक व एस-व्यासा विद्यापीठ बंगळुरूचे प्रकुलगुरू पद्मश्री डॉ. प्रल्हाद रामराव यांनी मांडले.
एमआयटी एडीटी विद्यापीठात ’इनोव्हेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स’ या विषयावर आधारीत सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद् घाटन समारंभात बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. पराग काळकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. विरेंद्र भोजवानी आदी उपस्थित होते.
डॉ. रामराव पुढे म्हणाले की, भारतात सध्या अणुऊर्जेवर मोठ्या स्तरावर संशोधन चालू आहे. अणू उर्जेचा सकारात्मक वापर करून अगदी तालुका स्तरावर ऊर्जा निर्मितीतून गावांच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्याचे उद्दिष्ट आता शास्त्रज्ञांचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. प्रा. डॉ. काळकर यांनी टेक जायंट्स, एआय, मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचे फायदे व तोट्यांबद्दल मत व्यक्त केले. त्यांनी मेक इन इंडिया सारख्या भारत सरकारच्या योजनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजल्याचेही स्पष्ट केले.
प्रा. डॉ. सुनीता कराड म्हणाल्या, एमआयटी एडीटी विद्यापीठ दरवर्षी ही राष्ट्रीय परिषद आयोजित करते. यंदा या परिषदेचे सहावे वर्ष असून त्यामाध्यमातून आत्तापर्यंत 60 स्टार्टअप्स व 2000हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.
यंदा 20हून अधिक विषय घेऊन विद्यापीठात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पुढील तीन दिवस ही परिषद पार पडणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुनीता कराड यांनी तर डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी आभार मानले. डॉ. स्नेहा वाघटकर व डॉ. स्वप्निल शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
तंत्रज्ञानाच्या धोक्यांपासून सावध रहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी विकसित भारत2047 संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेत संशोधकांचा सर्वांत मोठा हातभार लागणार आहे. भारतातील यूपीआय, आधारसारख्या योजना आता फ्रान्ससारख्या देशाने स्विकारल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस एआयसारख्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करत असताना त्यातील डिपफेकसारख्या धोक्यांपासून आपण सावध रहायला हवे, असा इशारा प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी दिला.