पुणे – वाढत्या लोकसंख्येबरोबर नागरिकांकडून पाण्याची मागणीही सतत वाढू लागली आहे. भविष्यकाळाचा विचार करून पाण्याचे संरक्षण व जतन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत विविध संस्थांच्या तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
दि इन्स्टीट्यूशन ऑफ इंजिनिअरची पुणे शाखा, राष्ट्रीय जल अकादमी, केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्र, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग, मराठी विज्ञान परीषद यांच्या वतीने जागतिक जल दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी या संस्थाचे अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी आपली मते मांडली. यावेळी अमित रास्ते, प्रज्ञा ठाकूर, डॉ.बाख, राहूल जगताप, मनीष राठोर, अनिल कुलकर्णी, डॉ.पाखमोडे, सुदर्शन तांदळे, डॉ.सुरेश नाईक, डी.टी.ढवळे, जयंत गुरव, डॉ. निलिमा राजूकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील भूजलाविषयी उपलब्ध असलेल्या माहितीचा पाणी वापराचे नियोजन करण्यात फायदा होतो. अनेक भागात पुनर्भरण व उपसा दरम्यान असंतुलन होत असल्याने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे, असे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे डॉ. पाखमोडे यांनी सांगितले.
प्रा. सराफ यांनी मिस वर्ल्ड युक्ता मुखीची मुलाखत घेतली. भारतातील महिला जल नियोजनाबाबत फार जागरुक असल्याने त्यांना जलक्षेत्रात पुढाकार घ्यावा लागणार आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीही प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे तीने मुलाखतीद्वारे स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “पाणी वाचवा’ या विषयावर जनजागृतीपर नाट्य सादर केले. यावेळी उपस्थितांनी पाण्याचे संरक्षण व जतन करण्याची शपथ घेतली.