पुणे – कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनीही उन्हाळ्यात आर्द्रता वाढल्याने करोनाचा विषाणू फोफावणार असल्याचे संकेत दिले आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे हाच हे संकट टाळण्याचा एकमेव उपाय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
करोनाची तिसरी लाट ओसरली आहे, पण शास्त्रज्ञांनी चौथी लाट येणार असल्याचे अनुमान लावले आहेत. आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी चौथी लाट 22 जूनच्या आसपास येण्याची आणि 24 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनीही उन्हाळ्यात विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित यांनी तसे संकेत दिले आहेत.
पाश्चात्य देशांमध्ये थंडीच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव जास्त होतो, तर भारतात उन्हाळा आणि वसंत ऋतूमध्ये. हाच कल पहिल्या दोन लाटेमध्ये दिसून आला आहे. उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असते आणि आर्द्रता वाढली की विषाणू वाढतात असे निदर्शनास आले आहे, असे डॉ. जोशी यांचे मत आहे.
करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उन्हाळ्यातच करोनाचा उच्चांक होता. थंडीच्या मोसमात तिसऱ्या लाटेने दार ठोठावले असले तरी त्यावेळी करोनाचे प्रमाण कमी होते अर्थात स्थिती नियंत्रणात होती, असे मत डॉ. पंडीत यांनी व्यक्त केले आहे.