पुणे(प्रतिनिधी) – पतसंस्थेतील ठेवीदारांच्या रकमा परस्पररित्या काढून घेत जमिनींची खरेदी करीत तब्बल ४७ कोटी १० लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धनकवडीतील आदर्श नागरी पतसंस्थेत डिसेंबर १९९१ ते जानेवारी २०१८ कालावधीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक, लेखा परिक्षकांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष लेखा परिक्षक विलास राजाराम काटकर (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास विशेष लेख परिक्षक असून निबंधक यांच्या आदेशानुसार त्यांनी आदर्श नागरी पतसंस्थेचे लेखापरिक्षण केले. त्यामध्ये पतसंस्थेच्या संचालक, पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या रकमा काढून जमिनी घेतल्याचे निष्पन्न झाले. पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस तपास करीत आहेत.