खासदार अमोल कोल्हे ः सुविधांबाबतही व्यक्त केली नाराजी
नारायणगाव – खेड-सिन्नर महामार्गावरील सुविधांचा अभाव व टोल नाक्यावर होणारे वाद टाळण्यासाठी संबंधित विभागाला लेखी पत्र देणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कोल्हे यांनी दिवाळीनिमित्त नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या तक्रारीवरुन विविध अडचणी समजून घेताना कल्याण- अहमदनगर महामार्गावरील डुंबरवाडी टोल नाक्यापासून उदापूरपर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे व साइडपट्टीवरील गवत, वाढलेली झाडी काढणे, डुंबरवाडी व चाळकवाडी टोल
नाक्यावर फास्टटॅग स्कॅन न झाल्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी व चालक यांच्यातील वाद टाळणे, टोल एजन्सीत होणाऱ्या बदलामुळे टोलच्या फास्टटॅग किंवा लोकल नोंदणीचे स्कॅनिंगमुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी टाळणे, टोलनाक्यालगत व खेड- सिन्नर महामार्गावर उभारलेल्या विश्रांती थांब्याजवळची स्वच्छतागृहाची स्वच्छता व 24 तास वापराकरिता खुली असणे, याबाबत प्रशासनाला तात्काळ सूचना देणार असल्याचे नमूद केले.
खासदार डॉ. म्हणाले की, नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरील खोडद चौकातील भुयारी मार्ग तयार करण्यासाठी तेथील माती तपासणीसाठी पाठविलेली आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर भुयारी मार्गाचे भूमिपूजन करण्यात येईल. महामार्गालगत असलेल्या गावांमधील प्रवासी थेट रस्त्यावर येत असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला रंबलर स्ट्रीप बसवून अपघाताचे प्रमाण कमी करणे, महामार्गाची दुरुस्ती
अथवा डायव्हर्जन असेल तर सूचना फलक व रिफ्लेक्टर, गावालगतचे हॅलोजन दिवे रात्रीच्या वेळात चालू ठेवणे, नादुरुस्त दिव्यांची दुरुस्ती, रात्रीच्या वेळी प्रवाशांचा सुखरूप प्रवास होण्यासाठी महामार्गावरील पेट्रोलिंग यंत्रणेस अलर्ट करणे, महामार्गावरील रस्त्याची कामे चालू असलेल्या किंवा रस्ता वळवलेल्या ठिकाणी सूचनाफलक, रिफ्लेक्टर्स व ठेकेदाराचे कर्मचारी रस्त्यावर उपस्थित असणे आवश्यक आहे. महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवणे, रस्ता क्रॉसिंग च्या ठिकाणी महामार्ग ट्राफिक पोलीस, प्रशासकीय यंत्रणा कार्यरत करणे आवश्यक असून संबंधित विभागाला रीतसर पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे.