एम. डी. पाखरे
आळंदी – आळंदी नगरपरिषदेचा लवकरच बिगुल वाजणार आहे. सध्या जरी भाजप-शिवसेना युतीची येथे सत्ता असली तरी हे दोन्ही पक्ष पाच वर्षांत पाणीप्रश्न आणि वाहतूककोंडीपासून आळंदीकरांची सुटका करू शकले नाहीत. तर विरोधकही नागरिकांचे प्रश्न सोडण्यात आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात यशस्वी झाले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत आधीच्या अश्वासनांचे काय झाले? पाणी, वाहतूककोंडी प्रश्नांपासून आळंदीकरांची सुटका होण्याचे पुन्हा आश्वासन पदारा घेणार की या दोन आणि अन्य मुलभूत प्रश्नांवर राजकीय पक्षांना “कोंडी’त पकडणार हे लवकरच समजेल.
आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे दिसत आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण तापयला सुरुवात झाली आहे. आजी, माजी व भावी नगरसेवक तयारीला लागल्याचे दिसत आहे. गेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारून शिवसेनेना सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. भाजपचे 19 पैकी जनतेतून नगराध्यक्षां (वैजयंता उमरगेकर)सह 12 सदस्य आहेत. शिवसेनेकडे सहा आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.
आळंदीत अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यावर कोणताही पक्ष आवाज उठवण्यास किंवा तो सोडवण्यास तत्परता दाखवत नसल्याने सध्या सर्वच पक्षांवर आळंदीकर कमालीचे नाराज आहेत. त्यात आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी आहे. तर युवकांपेक्षा ज्येष्ठांना संधी द्यावी, असाही सुरू सध्या आळंदीत सुरू आहे. पण निवडणुकी पूर्वी ना ज्येष्ठ ना युवक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाही किंवा आवाज उठवण्यास तयार नसल्याने आळंदीकरांनी नेमके कशाच्या जोरावर यांना मतदान करावे, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
आमदार मोहितेंचे वक्तव्य योग्यच
राजकीय कारर्किदीतील 25-30 वर्षे राजकारण पाहिले; पण माझ्या राजकीय कारकीर्दीत मला आळंदीचे राजकारण समजलेच नाही, असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आळंदीतील एका कार्यक्रमात नुकताच केला आहे. दरम्यान, हे खरे आहे, कारण येथील राजकीय नेते स्वतःच्या फायद्यासाठी कधी काय करतील, हे सांगता येत नाही, त्यामुळे आमदारांचे वक्तव्य योग्य असल्याने आळंदीतील राजकारण्यांवर “भरोसा नाय काय’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शिवसेना-भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यात शिवसेना-भाजपचे काडीमोड झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेनेसोबत जाणार की, पक्षाचा आदेशाला तडा जावू नये म्हणून शहर विकास आघाडी स्थापन करून यात सर्वपक्षीयांना सहभागी करून कोणी पुढाकार घेणार की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह इतर सगळेच पक्ष स्वबळावर लढणार? आणि जर सत्तेचे त्रांगडे झाले तर पुन्हा एकत्र येणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.