राहुल गणगे
पुणे – पर्यटनावर देशात सर्वाधिक खर्च महाराष्ट्रात केला जातो. यंदा एप्रिल ते सप्टेंबर सहा महिन्यांपसून करोनामुळे पर्यटक घरातच बसून होते. पर्यटनावर रेल्वे वाहतूक, फिरते विक्रेते, गाइड, वाहन चालक आदी व्यवसाय अवलंबून आहेत. करोनामुळे गार्डन, विविध धार्मिक, पर्यटन स्थळे अद्याप बंदच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उत्पन्नाचे अन्य स्रोत शोधण्याची वेळ आली आहे. यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायिकांची चाके बंद, हॉटेल थंड तर विक्रेते घरबंद अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या व्यवसायिकांमधून पर्यटन स्थळे सुरू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात उजनी बॅकवॉटर, भीमाशंकर, बनेश्वर, चतुःशृंगी मंदिर, जेजुरी, अष्टविनायक, शिवनेरी, पुरंदर, देहू, आळंदी, नारायणपूर तर शहरातील लोणावळा, सिंहगड, आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, सारसबाग, पेशवे पार्क, खडकवासला धरण, लाल महाल आदी व अशी अनेक पर्यटन स्थळे सध्या बंद आहेत. या पर्यटन स्थळांवर फिरून विक्री करणाऱ्या हजारो नागरिकांचा उदरनिर्वाह सुरू होता. परंतु करोनामुळे या व्यवसायिकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेला सर्व सामान्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न सध्या देशासमोर उभा राहिल. गरीबी हटवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सरकारचा पाय आणखीणच खोलात जाण्याची शक्यता आहे, अशी भीती विक्रेत्यांमधून व्यक्त होत आहे.
केवळ पर्यटन व्यावसायिकच नाहीत, तर हॉटेल व्यावसायिकांवरही मोठे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत जिल्हाबंदी करण्यात आल्यामुळे पर्यटन क्षेत्र गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या कंपन्यांच्या एजंटांवर आपली टुर्स आणि ट्रॅव्हल्स दुकाने बंद केली आहेत. करोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वात मोठा फटका पर्यटनाला बसला आहे.
त्यांच्यावर आली भाजी विकण्याची वेळ : करोना लॉकडाऊमुळे सर्वाधिक फटका पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांना बसला आहे.गेल्या सहा महिन्यांत ना धंदा ना काम अशी अवस्था या व्यसायिकांची झाली आहे. पर्यटन बंदीमुळे कोट्यवधी रुपयांचा फटका शासनास व व्यवसायिकांना बसला आहे. परिणामी अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांचे कंबरडे मोडले असून, त्यावर अवलंबून असलेले पर्यायी उद्योगही बंद पडले आहेत. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांतील टूर व्यवस्थापक फळे, भाजी व खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायात उतरले आहेत.त्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी त्यांची मागणी आहे.
पर्यटन बंदीमुळे देशातंर्गत सहलींवर 60 टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम झाला आहे. करोनामुळे सध्या ट्रॅव्हल्स व्यवसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे वाहतूक खर्चही निघत नाही. बुकिंगसाठी मानवी श्रम वाया जातात. वाहनांवर काढलेले कर्ज, वाहनांचे हप्ते फेडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे वाहने विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. याबाबत सरकारने योग्य दखल घेऊन पर्यटन स्थळे सुरू करण्याची गरज आहे. यातून तरी आमचा उदरनिर्वाह सुरू होईल.
– लखन काळे, ट्रॅव्हल्स व्यवसायिक.