दौंडच्या पश्चिम भागात पिकांचे मोठे नुकसान
यवत – दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात चौफुला, यवत, पिंपळगाव, देलवडी, नाथाचीवाडी लडकतवाडी, तांबेवाडी, कासुर्डी, भारतगाव आदी गावांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर पुन्हा एकदा मोठे संकट ओढावले आहे.
शेतकऱ्यांचे कांदासह तरकारी ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसीलदार दौंड यांनी अवकाळीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्याचे आदेश तलाठी व सर्कल यांना द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सोमवार (दि.२२) यवतसह परिसरात अचानक ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून प्रचंड उकाडा व उष्णतेचे वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता नसतानाही अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. लग्नाची मोठी तारीख असल्याने अनेक वराडी व नागरिकांकडे छत्री, रेनकोट साहित्य नसल्याने अनेकांना पावसात भिजावे लागले.
यवत बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर असलेले फ्लेक्स वाऱ्यात पडल्याने विक्रेते तसेच व्यापाऱ्यांनाही काही प्रमाणात फटका बसला. विजेचा प्रचंड कडकडाट चालू असतानाच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे विक्रेत्यांचे प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे देखील पडली होती. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सेवा रस्त्यावर व गावातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
यवत पोलीस स्टेशनजवळ असलेल्या पुलाखाली गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असल्याने अनेकांची वाहने बंद पडली, सव्वा तास यवत परिसराला झोडपडून काढले. वातावरणातील बदलामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत असतानाच अवकाळी पाऊस पडल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाऊस पडल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
– अरुण शेलार, तहसीलदार, दौंड.