एमआयटीचा 6 वा दीक्षांत समारंभ थाटात
लोणी काळभोर-सध्या जगभरात वर्ण, जातिभेद यावरून अशांतता माजल्याचे आपण पाहतो. परंतू आपल्या देशाची विविधता हिच आपले सामर्थ्य आहे. सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्थापित करू शकतात, असे मत रस्ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.
तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोम, विश्वराजबाग येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 6 व्या दिक्षांत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी डब्लूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, प्रा. डॉ. सुनिता कराड, ज्योती ढाकणे-कराड, डॉ. जी. डी. यादव, डॉ. विनायक घसनीस, डॉ सुचित्रा नागरे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, डॉ विरेंद्र शेटे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जीवनाशी व जीवनातील प्रत्येक गोष्टीशी असतो. मूल्याधिष्ठीत व संस्कृतीची जाण असणारे विद्यार्थी घडविण्याचे काम एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातूनच आपण गरिबी दूर करू शकतो. अशाच प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम या विद्यापीठाकडून घडत आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचे कार्य उल्लेखनीय आहे, असे म्हणत गडकरींनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या पाठीवर कौतुकाची थापही टाकली.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो), बंगळुरूचे माजी चेअरमन डॉ ए एस किरण कुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी डॉ. किरण कुमार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एकूण 2805 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात एमआयटी विद्यापीठातील 23 पीएचडी, 51 सुवर्णपदके व 188 विद्यार्थ्यांना रॅंक होल्डर प्रमाणपत्र यांसह एकूण 2805 विद्यार्थ्यांना मंत्री गडकरींच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह 7 हजारपेक्षा अधिक लोकांनी देशभरातून हजेरी लावली. तसेच यावेळी राज दंडासह काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणूकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विश्वशांती डोमला करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने विद्यापीठाचा परिसर उजळून निघाला होता. दीक्षांत समारंभाचे चेअरमन डॉ रामचंद्र पुजेरी यांनी आभार मानले.
आपला शेतकरी आता ऊर्जादाता
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आपला शेतकरी आता ऊर्जा दाता बनला आहे. त्यामुळे भविष्यात भारत हा ऊर्जा आयात करणारा नाही तर निर्यात करणारा देश ठरेल. सर्व धर्माचा सन्मान करणे सध्या काळाची गरज आहे. त्यातूनच विश्वशांतीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. देशाला पुढे घेऊन जायचे असल्यास आपल्या संशोधनाला आणखी आघाडीवर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. इस्त्रोने भारताला अंतराळ संशोधनातील एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. इस्त्रो अंतराळ संशोधनात करत असलेले कार्यही देशासाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.