हायब्रीड ऍन्युइटीतून काम अंतिम टप्प्यात ; वेळेसह इंधनाची बचत
बारामती – पोटातील पाणीही हलणार नाही, अशा गुळगुळीत रस्त्यावरुन बारामती ते जेजुरी हे 50 किलोमीटरचे अंतर आता अवघ्या 35 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
हायब्रीड ऍन्युइटी (हॅम) योजनेअंतर्गत जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्त्याचे काम सुरु आहे. यामध्ये जेजुरी ते मोरगाव हा टप्पा पूर्ण झाला आहे. आता मोरगाव ते काऱ्हाटीपर्यंत रस्त्यावरील डांबरीकरणाचा अंतिम थर टाकून पूर्ण झाला आहे. काऱ्हाटी ते बारामतीपर्यंतचे काम येत्या पंधरवड्यात संपणार आहे. त्यानंतर महिन्याभरानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला व मधोमध थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे आखून त्यावर कॅटआईज (रिफेल्कटर असलेले छोटे चौकोनी प्लॅस्टिकचे तुकडे) बसविले जातील. याशिवाय अवघड व तीव्र वळणावर गाडी रस्त्याच्या खाली जाऊ नये, यासाठी संरक्षक जाळीही उभारली जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एच. खत्री कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. यांच्यामार्फत डांबरीकरणाचे उत्तम काम सुरु आहे. बारामती ते जेजुरी हा प्रवास येत्या काही दिवसात कमालीचा सुखकर बनणार आहे. रात्रीच्या वेळेस अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने होणारे अपघात थर्मोप्लास्ट पट्टे आखल्यामुळे कमी होतील. तसेच सुखकर आणि सुरक्षित प्रवासाची सफर आता प्रवाशांना अनुभवयास मिळणार आहे.
उच्च तंत्रज्ञानाचा वापर
हा रस्ता करताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात अत्याधुनिक इंपोर्टेड अशी तीन रोलर्स, एक पीटीआर पेव्हर मशीनचा वापर करुन रस्ता होत असल्याने त्याचा दर्जा उत्तम असेल. यासाठी संबंधित कंपनीकडून दर्जेदार काम होणार आहे. बारामती- जेजुरी मार्ग हा सध्या वर्दळीचा झाला आहे. (हॅम) योजनेअंतर्गत हा मार्ग होत आहे. यातून वेळेचा आणि इंधनाची बचत होणार आहे.