इंदापूर तालुक्यातील स्थिती : उत्पादन खर्च जास्त येत असल्याने डाळिंबाकडे पाठ
मधुकर गलांडे
बिजवडी – इंदापूर तालुका तसा पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. उजनीच्या निर्मितीनंतर बागायती तालुका म्हणून ओळख झाली. येथील शेतकरी उसाबरोबर नवनवीन पिके घेऊ लागला. त्यात कमी पाण्याच्या पिकांकडे वळू लागला. त्यात प्रथम तत्याने डाळिंब पिकाला पसंती दिली; परंतु डाळींबाला वातावरणातील बदलामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त येऊ लागल्याने इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आल्याने डाळिंब लागवडीचे क्षेत्र घटल्याचे दिसून आले. तर पेरुने उभारी घेतल्याचे दिसत आहे.
खरे तर डाळिंब कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारे पीक आहे. या पिकाकडे रोख रकमेचे पीक म्हणून गेले; मात्र मागील काही हंगामापासून आणि हवामानातील बदलामुळे डाळिंब या पिकापासून शेतकरी जरा लांबच होत अन्य पिकांकडे वळला आहे. इंदापूर तालुक्यात या हंगामात डाळिंब लागवडीत घट झाल्याचे दिसून आले आहे. तर डाळिंबनंतर पेरू या पिकाकडे वळल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर केळीला सुद्धा पसंती असल्याचे दिसत आहे.
इंदापूर तालुका हा उजनीच्या भागातील बागायती म्हणून ओळख असली तरी, उजनीचा हरित पट्टा सोडला तर बाकीचा काही भाग कालवा आणि काही भाग नीरा नदीवर ओलिताखाली येणारा आहे. आणि या दोन्हीही भागात पाण्याची शाश्वती नसल्याने सतत पाणीटंचाइला तोंड द्यावे लागत असल्याने य भागातील शेतकऱ्यांना डाळिंब हे कमी पाण्याचे पीक वरदान ठरले होते. मात्र या पिकावर हवामान बदलाचे होणारे परिणाम आणि त्यापासून होणारी रोगराई यावर प्रतिबंध करताना आर्थिक कोंडी होऊ लागली.
उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च मोठा होऊ लागला. तर कधी उत्पादन जास्त झाले तर त्याला दर मिळेनासा झाला. दर मिळत असेल तर डाळिंबवरील रोगाने उत्पादन घटले. कधी पीक चांगले आहे पण त्यावर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने त्याला दर नाही अशी कोंडी झाल्याने शेतकरी अडचणीत येऊ लागला.
कधी काळी या डाळिंबाच्या पिकाने शेतकरी कोट्यधीश करून टाकला होता. पण आज तशी स्थिती डाळिंबाची राहिली नाही. काही बोटावर मोजण्या एवढी मंडळी लाखात उत्पादन घेणारे राहिले आहेत. काहींनी तर तेल्या रोगाच्या भीतीने बागाच उपटून टाकल्या आहेत आणि इतर पिकाकडे मोर्चा वळवला आहे.
बळीराजा दुहेरी संकटात
बदलत्या वातावरणाबरोबर या फळबागांवर तेल्या संकट, मर, कुजवा, आणि पीन होल बोअर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी अनियमित पाऊस यामुळे उत्पन्न घटले आहे. अशा दुहेरी संकटामुळेच शेतकरी डाळिंब लागवडीचे धाडस करीत नाही. त्यामुळे शेतकरी आता पेरुकडे वळला आहे. तर पेरूच्या लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे.
ऊस, डाळिंबाचे क्षेत्र झाले कमी
2020 ते 2022 च्या तुलनेत डाळिंबाच्या लागवडीच्या जागेवर पेरू उभारी घेत आहे. 2020-21 मध्ये 477 हेक्टरवर असणारा पेरु 2022-23 मध्ये 1281 हेक्टर पर्यंत गेला. तर सीताफळ ही वाढू लागले आहे. त्या मानाने ऊस आणि डाळिंब कमी झाले आहे. 2020-21 ला डाळिंब 8223 हेक्टर होते 2021-22मध्ये ते 6063 हेक्टरवर आले तेच 2022-23 ला 2873 हेक्टरवर आले आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात घट आली. तर त्याचबरोबर इतर फळ पिके ही शेतकरी प्रायोगिक तत्वावर करण्याचा प्रयत्न करीत आहे.