भाजपचे दिलीप खैरे यांचा घणाघाती आरोप : जिरायती भागावर अन्याय
बारामती – निसर्गाची अवकृपा अन् लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. बारामती, पुरंदर तालुक्यातील जिरायत भागातील शेती सिंचनासाठी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना करण्यात आल्या. त्यासाठी 25 वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले . परंतु नेतृत्वाच्या स्वार्थी भूमिकेने या योजनांचे पाणी अपवाद वगळता मिळणे स्वप्नच राहिल्याचा आरोप भाजप नेते दिलीप खैरे यांनी केला आहे.
खैरे म्हणाले, बारामती पुरंदर तालुक्यातील जिरायत भागातील शेती सिंचनासाठी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना करण्यात आल्या. त्यासाठी 25 वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु या योजनांचे पाणी अपवाद वगळता मिळणे स्वप्नच राहिले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात उपसा सिंचन योजनासाठी आवर्तन काळात 24 तास अखंड वीजपुरवठा आणि पाणीपट्टी 19 टक्के आकारणीचा निर्णय झाला.
त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच सरकार बदलले. त्यानंतर ठाकरे – पवार यांच्या सरकारने वीज दर वाढवले. परिणामी पाण्याचे दर पुन्हा शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मागीलवर्षी पाणी मिळाले नाही. परिसरातील पिके देखील जळाली होती. दौंड, इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आपल्या भागातील शेतीचे पाण्यासाठी प्रचंड आग्रही भूमिका घेतात. जास्त पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
अजित पवार मात्र गप्प का?
खैरे म्हणाले की, बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार मात्र पुणे शहर व बाजूच्या भागातील हितसंबंध दुखावले जाऊ नयेत, म्हणून बारामतीच्या जिरायती भागाच्या वाट्याचे पाणी इतरत्र वळविले जात असताना गप्प बसतात. इतकेच काय तर मागील सरकारमध्ये प्रमुख असतानाही या योजनांचे पाणी दर वाढवून आपल्या मतदारसंघातील प्रामाणिक मतदार शेतकऱ्यांशी द्रोह केला. त्यांना जिरायती भागात यापुढे फिरताना शेतकरीविरोधाचा सामना करावा लागणार असून याचा जाब अजित पवार यांनी द्यावा, अशी मागणी खैरे यांनी केली आहे.