नारायणगाव – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तमाशा फड मालकांना १ फेब्रुवारीपासून तमाशा फड चालू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील यात्रा, जत्रां मध्ये छुम छूम वाजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी (दि.२२) तमाशा फड मालकांनी तमाशाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील आमदार अतुल बेनके यांच्या घरासमोर तमाशाचे फड चालू करण्यास परवानगी मिळावी अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आत्मदहन करू असा इशारा दिला होता. त्यावेळी आमदार अतुल बेनके यांनी तमाशा कलावंतांनी टोकाचा निर्णय न घेता तमाशाचे फड चालू करण्यासाठी मार्ग काढू असे सांगितले होते.
तमाशा फड मालकांना सांगितल्याप्रमाणे सोमवारी (दि.२४) मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार अतुल बेनके यांनी तमाशा फडमालक मुथ्थाभाई इनामदार, मोहित नारायणगावकर, अविष्कार मुळे यांच्यासमवेत चर्चा करून शासन तमाशा कलावंत यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. व १ फेब्रुवारीपासून तमाशाचे फड चालू करण्यास परवानगी दिली. तसे शासनाचे अधिकृत पत्र २८ जानेवारीपर्यंत तमाशा फड मालकांना देण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीपक्ष वेल्फेअर फंडातून प्रत्येक तमाशा कलावंताला रुपये ३००० देणार असून त्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार आहे. स्व. विलासराव देशमुख यांनी तमाशा फड मालकांना सुरू केलेला ८ लाख रुपयांचा निधी मार्च २०२२ मध्ये देण्याचे निश्चित केले. त्यामुळे तमाशा कलावंतांचा आर्थिक प्रश्न सुटला असून तमाशा कलावंतांना आपली कला सादर करता येणार आहे.