अकलूज -महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ महावितरण कार्यालय अकलूज येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, तालुकाध्यक्ष. बाजीराव काटकर, बाळासाहेब वावारे, बाळासाहेब सरगर, संजय देशमुख, रणवीर देशमुख, फातीमा पाटावाला, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहिते- पाटील म्हणाले, राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांना नोटीस पाठवून वीज पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात नंतर सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना वीज बिल माफीचे आश्वासन देणारे राज्यसरकार आता सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला वेठीस धरत त्रास देत आहे.
वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणार महाविकास आघाडीच सरकार जनतेप्रती किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. करोनानंतर सामान्य जनतेला प्रचंड आर्थिक झळ बसली आहे.