नारायणगाव – लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात २७ ते ३० डिसेंबर कालावधीत पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
कांद्यावरील निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आल्याने खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी केली असता दोघांनाही निलंबित करण्यात आले. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी शेतकऱ्यांची ही लढाई रस्त्यावर लढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे रणशिंग फुंकले.
बैठकीत ठरल्याप्रमाणे बुधवार (दि. २७) ते रविवार (दि. ३०) या कालावधीत ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची सुरुवात होणार असून, २७ तारखेला शिवनेरी (ता. जुन्नर) येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण (मशाल मोर्चा), केंदूर, २८ ला केंदूर येथून शिक्रापूर, न्हावरा, मांडवगण, निर्वि मार्गे दौंड आणि २९ तारखेला इंदापूर मार्गे बारामती येथे जाणार आहे.
बारामती शहरात मशाल मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला जाईल. ३० डिसेंबरला बारामती येथून उरळीकांचन, कुंजीरवाडी, हडपसरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दुपारी ३ वाजता सांगता सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.