शेतकऱ्यांसह परिसरातील उद्योजक हैराण
खेड शिवापूर – शिवगंगा खोऱ्यामध्ये दिवसातून पाच ते सहा वेळा वीज गायब होत असून, याचा त्रास स्थानिकांसह व्यावसायिक, शेतकरी, छोटे उद्योजक आणि प्रामुख्याने सार्वजनिक पाणी पुरवठ्यावर होत असून या भागातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून शिवगंगा खोऱ्यात महावितरण विभागाच्या नियोज शून्य कारभारामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही यामध्ये काही सुधारणा होत नसून, आता महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांनी सांगितले. शिवगंगा खोऱ्यातील गावांमध्ये पिण्याचे पाणी सार्वजनिक विहिरीमधून पुरविले जाते. सकाळी दोन तास पाणी पुरवठा केला जातो, तर विजेअभावी काही ठिकाणी पाणी पुरवठा होतच नाही. याबरोबरच रोजची घरगुती खासगी कामे विजेअभावी होत नसल्याचे दिसून येत आहे. या खोऱ्यात औद्योगिकिकरण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्वात जास्त आर्थिक फटका या कंपन्यांना बसत आहे. यामुळे महावितरणने या गोष्टींची गांभीयांने दखल घेऊन वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार
खंडित वीज पुरवठ्याबद्दल उद्योजक, नागरिक संबंधित अधिकाऱ्यांना फोन करीत आहेत. मात्र, अनेक वेळा त्यांचे फोन उचलले जात नाहीत. त्यामुळे अगोदरच खंडित वीज पुरवठ्याने त्रस्त असलेल्या उद्योजकांच्या संतापात भर पडत आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या दूर करून वीज पुरवठा सुरळीत सुरू राहील.
– अभिजित भोसले, कनिष्ठ अभियंता, महावितरण, वेळू शाखा
आमच्या गावातील पाच एकर जमीन महावितरण विभागाला उपकेंद्रासाठी दिली आहे. मात्र, त्याचा गावाला तसेच या भागाला काहीच उपयोग होत नाही. खंडित वीजपुरवठ्यामुळे गावाला साधा पाणी पुरवठाही करता येत नाही.
– राजेंद्र सट्टे, उपसरपंच, शिवापूर
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शिवगंगा खोऱ्यात वीज अनेक वेळा खंडित होत असून, रोज दोन-अडीच हजार रुपयांचे डिजल जनरेटरला लागते आहे. ज्या हॉटेल व्यवसाईकाकडे जनसेट नाही त्या हॉटेल व्यवसायिकाला हॉटेल बंद करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
– शंकर कोंडे, व्यावसायिक, शिवापूर