गोकुळ टांकसाळे
भवानीनगर -जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन दोन मिंहने होत आहेत. यात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी यंदा ऊस गाळप आणि उत्पादनात खासगी कारखान्यांची सरशी झाल्याचे चित्र दिसत आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने साखर उताऱ्यात वाढ झाली आहे. यात विघ्नहर साखर कारखान्याचा उतारा सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात 11 सहकारी आणि 5 खासगी साखर कारखाने आहेत. गेल्या पंधरा वर्षांत खासगी कारखान्यांची संख्या वाढली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव दौंड तालुक्यात आहे. भीमा- पाटस कारखान्याचे धुराडे पेटले नसल्याने दौंड तालुक्यातील ऊस उत्पादकांना खासगी कारखाने आणि गुऱ्हाळावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काच्या कारखान्यांपासून वंचित राहावे लागत आहे.
दौंड तालुक्यात दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर यवत हे खासगी कारखाने आहेत. हे तीन कारखाने गाळप हंगामात सुमारे 15 लाख टन ऊस गाळप करतात. त्यामुळे भीमा- पाटसची उणीव या खासगी कारखान्यांनी भरून काढली आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील सहकार जवळपास संपुष्टात आला आहे. आता फक्त आंदोलनापुरताच उरला आहे.
जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात ऊस गाळप हंगामाने गती पकडली आहे. एकूण 16 कारखान्यांची सरासरी गाळप क्षमता प्रती दिन 1250 ते 6500 टन क्षमता आहे. थंडीचा परिणाम साखर उताऱ्यावर झाला आहे. त्यामुळे उताऱ्यांबरोबर वजनात वाढ होत आहे. बारामती ऍग्रो कारखान्याने गाळप आणि उत्पादनात आघाडी घेतली आहे.
या कारखान्याने 5 लाख 69 हजार 190 हजार टन गाळप केले आहे. 5 लाख 37 हजार पोत्यांचे उत्पादन केले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दौंड शुगर कारखाना गाळपात 4 लाख 34 हजार 385 टन इतके गाळप झाले आहे. हे दोन्ही कारखाने खासगी आहेत. त्यामुळे गाळप हंगामाच्या प्रारंभापासून दोन खासगी कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
गाळपात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 15 हजार 888 टन गाळप केले आहे. माळेगाव कारखाना साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारखान्याने 4 लाख 18 हजार 200 पोत्यांचे उत्पादन केले आहे. दौंड शुगर कारखान्याने साखर उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 4 लाख 14 हजार इतक्या पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
इतर कारखान्यांतील गाळपावर दृष्टीक्षेप
श्री छत्रपती कारखान्याने 3 लाख 52 ंजार 712 हजार टन गाळप तर 3 लाख 41 हजार 900 पोती साखर उत्पादन घेतले आहे. श्री सोमेश्वर कारखान्याने 3 लाख 46 हजार टन गाळप तर 3 लाख 53 हजार पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. श्री विघ्नहर कारखान्याने 3 लाख 38 हजार 900 टन गाळप तर 3 लाख 35 हजार 800 पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. घोडगंगा कारखान्याने 2 लाख 53 हजार 650 टन गाळप तर 2 लाख 64 हजार 400 पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
भीमाशंकरने 2 लाख 34 हजार 720 टन गाळप तर 2 लाख 26 हजार 100 पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने 2 ल्ाख टन गाळप केले असून 1 लाख 98 हजार पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. राजगड कारखान्याने 20 हजार टन गाळप केले असून सव्वा लाख टन पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
सहकारी कारखान्यांची घरसण चिंताजनक
साखर उताऱ्यात घोडगंगा (10.54), श्री सोमेश्वर (10.23), विघ्नहर (10.17) हे तीन सहकारी कारखाने अग्रेसर आहेत. गाळप आणि उत्पादनात खासगी कारखान्यांने मुसंडी मारली असली तरी उताऱ्यात सहकारी कारखाने अग्रेसर आहेत. खासगी कारखान्यांचा उतारा 9.60 टक्क्यांच्या आतच आहे. गेल्या पाच वर्षांत सहकारी कारखान्यांची गाळप आणि उत्पादनात होत असलेली घसरण चिंतेची बाब ठरली आहे.
==========================