पेठ -नित्याचीच वाहतूक कोंडी असा शिक्का बसलेल्या खेड घाटाला पर्ययी घाट आता तयार झाला आहे. पूर्व बाजूने तयार झालेल्या घाटाची एक लेन सध्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. दुसरी लेनही दिवाळीपूर्वी सुरू होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही बाजूने रस्ता खुला झाल्यानंतर वाहतूककोंडी कायमची संपणार असून वाहनचालकांचा प्रवास विनाअडथळा होणार आहे.
खेड घाटाचे काम गेल्या दोन अडीच वर्षे चालू होते; भूसंपादन, वनविभागाची परवानगी, कामासाठी निधी कमी, ठेकेदार पळून जाणे यामुळे हे काम अनेकदा रेंगाळलेलले पाहायल मिळाले. यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुाववा करून या नव्या घाटासाठी नव्याने निविदा काढायला भाग पाडले. यानंतर घाटाचे रखडलेले काम बऱ्यापैकी वेगात होऊन किमान एक बाजूच्या रस्त्याने वाहतूक सुरू झाली आहे.
गेल्या 45 ते 50 वर्षांपासून खेड घाट नागमोडी वळण घेत आहे. पूर्वी वाहने कमी होती त्यामुळे वाहतूक सुरळीत होत होती; मात्र गेल्या 10 वर्षांत लाखो दुचाकी व चारचाकी वाहने वाढली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अलीकडच्या काळात ही वाहतूक 5 ते 6 पटींनी वाढली. सुरवातीला पेठ आणि खेड या दोन्ही घाटांत वाहतूक खोळंबा होत असे; परंतु पेठ नवीन घाट तयार होऊन आणि सुरू होऊन दोन वर्षे पूर्ण झाली तरी खेड घाट मात्र अडचणीत होता. आता खेड घाटाच्या एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने रोज मालवाहतूक करणारे मोठे ट्रक, टेम्पो चालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत
जुन्या घाटातून पुण्याहून येणारी एकेरी वाहतूक तात्पुरती सुरू केली आहे. त्यामुळे आता घाटात वाहतूक ठप्प होणार नाही. घाटात वारंवार वाहने बंद पडणे, अपघात होणे, दरड कोसळणे, वाहतुकीची कोंडी होणे यामुळे तासन् तास वाहतूक खोळंबा होण्याचे संगमनेर ते पेठ-राजगुरूनगर दरम्यान खेड घाट हे एकमेव ठिकाण होते. संगमनेरचा चंदनापुरी, पेठ आणि त्यानंतर खेडच्या घाटात नागमोडी वळणे होती. आता ही वळणे निघाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे.
आता बाह्यवळणांनी वेग घ्यावा
नारायणगाव बाह्यवळण काम वेगाने सुरू आहे; मात्र मंचर आणि राजगुरूनगर शहर बाह्यवळण काम ठप्प आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घाट संपले आहेत, त्यामुळे मंचर तुरळक वाहतूक कधीतरी होते. राजगुरुनगर येथील वाहतूक मात्र बाह्यवळण कामाअभावी अडचणीची ठरणार आहे.