राजगुरूनगर – खेड तालुक्यातील पुणे चक्राकार महामार्गांच्या 12 गावातील संपादनामध्ये शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी राजगुरूनगर येथे रिंग रोडच्या कार्यालयासमोर कृषी युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद घेनंद व शेतकरी राहुल शिंदे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
रिंग रोड प्रकल्पात तालुक्यातून खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी ग्रामीण, चऱ्होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या गावांचा समावेश होत असून त्यासाठी शासनाकडून जमिनी संपादित झाल्या आहेत. या रिंगरोडला सुरुवातीपासून स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यासाठी अनेक आंदोलनाने झाली. शासनाकडून शेतकऱ्याच्या समस्या प्रश्न सोडवले जात नाहीत. संपादित जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिंग रोड सुरू आहेत; मात्र शासनाकडून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतली जात आहे. खेड तालुक्याला वेगळा न्याय दिला जात आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी प्रसाद घेनंद, राहुल शिंदे हे युवा शेतकरी राजगुरूनगर येथील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील रिंग रोडच्या कार्यालयासमोर काल दि. 16 पासून उपोषणास बसले आहेत. त्यांना बारा गावातील शेतकऱ्यांच्या, तालुक्यातील जिल्ह्यातील विविध संस्था संघटना यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनकर्त्यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. राम गावडे, रिंगरोड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी,
खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, जिल्हा परिषद माजी सदस्य अतुल देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती बाळ ठाकूर, रामदास ठाकूर, भाजप जिल्हा संघटक गणेश सांडभोर, सागर लोखंडे, विकास वर्पे, सुनील वर्पे, नारायण वर्पे, मनोज मुंगसे, अमोल वीरकर, बाळासाहेब चौधरी, सतीश मुऱ्हे, चंदन मुऱ्हे, निखिल घेनंद, सुधीर गोडसे, हिरामण ठाकूर, तन्मय गावडे, अक्षय गावडे, वैभव गावडे, काळुराम घेनंद, शाम बवले आदी शेतकरी व प्रतिनिधी यांनी भेट देत उपोषणास पाठिंबा दिला.
या आहेत मागण्या
प्रभावक्षेत्राची अट वगळून खेड तालुक्यातील बारा गावांमध्ये ग्रामीण विभागाप्रमाणे मोबदला दिला जावा, आमचा प्रकल्पाला विरोध नाही; परंतु चुकीचे निकष लावून दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला विरोध, बागायत/हंगामी बागायत यांचे चुकीचे निकष काढून सर्व क्षेत्राला बागायत प्रमाणे मोबदला दिला जावा. मागील आंदोलनात शेतकऱ्यांवरील सगळे गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत. मरकळ, गोलेगाव गावांसाठी 15 मीटर सेवा रस्ता दिला जावा. संमतीसाठी दिली गेलेली तारीख वाढवून डिसेंबर महिन्यापर्यंत संमतीची तारीख वाढवून द्यावी.