बारामती – भारतात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर परदेशातून मिलू हे धान्य आयात करून ते खाण्याची वेळ या देशातील नागरिकांवर आली. ही स्थिती परत येऊ द्यायची नसेल तर शेतकर्यांच्या पिकाला जास्त भाव मिळण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
बारामती शहर परिसरातील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कृषीक 2024170 एकर प्रक्षेत्रावर आयोजित केलेल्या कृषी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कर्नाटकचे कृषिमंत्री चेलुवरय्यास्वामी यांच्यासह ऑक्सफर्ड विद्यापीठाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे प्रमुख डॉ. अजित जावकर, ग्री पायलट कंपनीचे संस्थापक व संचालक कस्टमर सेक्टर लीडर मॅन्युफॅक्चरिंग मायक्रोसॉफ्ट इंडियाचे प्रशांत मिश्रा, मंदार कुलकर्णी, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे मत्स्य विभागाचे आयुक्त डॉ. अतुल पाटने, स्मार्ट पुणेचे आयएएस प्रकल्पाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, प्रतापराव पवार, डॉ. एस.के.रॉय, प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक डॉ. सुभाष नांगरे, राज्याचे कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, देशामध्ये पिकवणार्यांपेक्षा खाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून पिकविणारा वर्ग असलेल्या शेतकर्यांना त्यांची उत्पादकता वाढून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, अन्यथा पिकवणारा वर्ग कर्जबाजारी झाला तर वर्ग कोणावर अवलंबून राहणार? सवाल करत ही जबाबदारी केंद्र सरकारची अधिक आहे, असे त्यांनी नमूद केले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा सादर करून आत्तापर्यंत बारा लाख शेतकर्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला असल्याचे सांगितले.
“शरद पवार यांच्या पुढाकारामुळे देशातील शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले असून एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा आपला देश अन्नधान्य उत्पादनात शरद पवार यांच्या दूरदृष्टी मुळे अन्नधान्य निर्यात करणारा देश झाला आहे. कर्नाटक मध्ये बेळगाव या जिल्ह्यात त्यांच्या पाठबळामुळे दुसरे कृषी विज्ञान केंद्र मंजूर झाले. कर्नाटक मध्ये 33 कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्यामुळे कर्नाटक सरकारच्या व जनतेच्या वतीने मी शरद पवार यांना धन्यवाद देतो.”- चेलुवरय्या स्वामी, कृषीमंत्री, कर्नाटक राज्य
शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा
सध्या शेती क्षेत्रामध्ये पाणी, जमिनीचा पोत, बी बियाणे, खते, पिकांना मिळणारी किंमत, उत्पादन खर्च असे अनेक प्रश्न असल्याने शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा झाला असल्याची भावना अनेक शेतकरी व्यक्त करतात. अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करणे हेच शेतकर्यांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मदत करण्यासारखे आहे.