चाकण परिसरात वाहतूक कोंडी फुटेना : बाह्यवळणही प्रलंबितच
कल्पेश भोई
चाकण – वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोड या पर्यायाचा शासनाकडून गांभीर्याने विचार करण्यात येतोय. राष्ट्रीय हमरस्त्यावर सातत्याने जाणवणार्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून महाराष्ट्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडी) चाकण बाह्यवळण मार्गाची रचना केली; मात्र गेल्या काही वर्षांपासून ते काम प्रलंबित असून सध्या तरी वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे व इच्छितस्थळी पोहोचणे याशिवाय वाहन चालकाला पर्याय नाही.
मराठवाडा विभागाशी जोडल्या जाणार्या चाकण-शिक्रापूर मार्गावरील रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी मार्गे पुणे-नाशिक हा रस्ता असा बाह्यवळण मार्ग तीन ते चार किलोमीटर अंतराचा आहे. या प्रस्तावित मार्गावर अनेक शेतकरी बाधित होत असून काही शेतकर्यांनी जमिनीचा मोबदला घेतला तर काही शेतकर्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या मार्गावर आधुनिक पद्धतीने मोजणी देखील झाली आहे; परंतु अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव रखडला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
अहमदनगरकडून मुंबईकडे जाणार्या अवजड वाहतुकीला सध्याचा तळेगाव मार्गावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने चाकण शहरातील अवैध पार्किंग, छोटे विक्रेते, पादचारी, खराब रस्ता या अडचणी प्रामुख्याने आहेत. माणिक चौकातील एसटी स्थानकापासून पुण्याकडे जाताना अवजड वाहनांची एकेरी वाहतूक केली आहे; परंतु असे असताना देखील पुढे नाशिक रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. सातत्याने जाणवणार्या वाहतूक कोंडीवर सध्या अस्तित्वात असलेला चारपदरी रस्ता सहापदरी करण्याचा प्रस्ताव आहे; मात्र याबाबत सरकारकडून कुठलाही निर्णय किंवा वाहतूक सुधारण्याबाबत हालचाल याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हॉटस्पॉट ठिकाण
पुणे-नाशिक महामार्गावर मोई, चिंबळी, कुरुळी, बर्गे वस्ती, एमआयडीसी, आळंदी फाटा, तळेगाव, आंबेठाण चौक, वाकी, रोहकल फाटा ही वाहतूक कोंडीची ठिकाणे झालेली आहेत. वाहतूककोंडी काही नागरिकांचा, प्रवाशांचा, वाहन चालकांचा पिच्छा सोडत नाही. अगदी एक, दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना एक, दोन तास लागतात ही भयानक अवस्था आहे.
खेड तालुक्यातील सुमारे 12 ते 15 गावांतून रिंगरोड मार्ग प्रस्तावित असून जिल्हा प्रशासनाकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मोई, कुरूळी, चिंबळी या गावातील संपादित क्षेत्रासाठी सहा कोटी रुपये प्रति हेक्टरी दर निश्चित केला आहे. तरीदेखील या मार्गासाठी शेतकरी विरोध करीत आहेत. ज्या शेतकर्यांनी जमिनी दिल्या, त्यांनी संमती पत्र देताच 25 टक्के रक्कम देण्यात येत आहे. खेड तालुक्यातील सुमारे 300 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. खालुंब्रे, निघोजे, मोई, चिंबळी, केळगाव, चर्होली, धानोरे, मरकळ, सोळु, गोलेगाव, आळंदी या गावातील जमिनी रिंगरोडसाठी संपादित केल्या जाणार आहेत.
त्या गावात…
ज्या गावातील सरकारी दर निश्चित झाला नाही त्या ठिकाणी गेल्या तीन वर्षांतील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार व रेडीरेकनर याचा तुलनात्मक अभ्यास करून दर निश्चित केला जाईल, असे समजते. साधारणपणे तीन ते पाच कोटी रुपये प्रति हेक्टर असा दर राहील असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे विविध टप्प्यात वाटप केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.
बाधित जमीन बागायती क्षेत्र
रिंगरोडसाठी बाधित जमीन बहुतांशी इंद्रायणी नदीच्या परिसरात असल्याने बागायीत क्षेत्र आहे. रिंगरोड विरोधात बाधित शेतकर्यांनी उपोषण आंदोलनही केले होते. यासाठी कृषी युवा क्रांती या संघटनेच्या माध्यमातून युवावर्ग सक्रिय झाला असून या आंदोलनाला विविध स्तरातून उस्फूर्त पाठिंबा मिळत आहे.