अवसरी -केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा हिताचा विचार करावा आणि कांदा निर्यातीवर घातलेली बंदी त्वरीत मागे घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे प्रतिपादन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी व्यक्त केले.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या नेतृत्वाखाली अवसरी ग्रामस्थांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात निषेध व्यक्त केला, यावेळी ते बोलत होते. यावेळेस भीमाशंकर कारखान्याचे संचालक शांतारामबापू हिंगे, वसंत हिंगे, बीपीसीएल आंबेगावचे अध्यक्ष गौतम रोकडे, सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, सुनील पांडुरंग हिंगे, विलास हिंगे, अजित वाडेकर, विकास हिंगे, प्रशांत वाडेकर उपस्थित होते.
मागील सहा महिन्यांपासून वातावरण बदल, तसेच हवामानाचा फटका, करोना लॉकडाऊन यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. सध्या कुठे तरी कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली होती. हे सगळे सहन करत आज शेतकऱ्यांना चांगला भाव मिळायला लागला होता, तेवढ्यात केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. निर्यात बंदी तातडीने मागे न घेतल्यास मंचर येथे मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विष्णू हिंगे यांनी दिला आहे.