किसान सभेच्या अधिवेशनात ठराव
मंचर – आंबेगाव तालुका किसान सभेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन तळेघर (ता. आंबेगाव) येथे पार पडले. वाढती बेरोजगारी, महागाई याविषयी तीव्र लढा उभा करण्याचा ठराव अधिवेशनात संमत करण्यात आला.
किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ऍड. नाथा शिंगाडे म्हणाले, केंद्र व राज्य शासन आदिवासी, दलित व महिला यांच्या विरोधात जी भूमिका घेत आहे. त्याविरोधात त्यांनी लढा उभा करण्याचे आवाहन उपस्थिताना केले. यावेळी किसान सभेचे तालुका सचिव अशोक पेकारी यांनी मागील तीन वर्षांच्या कामकाजाचा अहवाल मांडला. उपस्थित प्रतिनिधींनी या अहवालावर चर्चा करून हा अहवाल एकमताने संमत केला. यावेळी किसान सभेचे तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर यांनी आपल्या भाषणात किसान सभेच्या आंदोलनामुळे गावोगावी रोजगार हमीचे व कामे सुरू झाली, तसेच विधवा, निराधारांना पेन्शन मिळाली.
“एसएफआय’चे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी यांनी उपस्थित राहून अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय किसान सभेची, आंबेगाव तालुका समितीची निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित आंबेगाव तालुका समितीच्या अध्यक्षपदी नंदा मोरमारे आणि सचिवपदी रामदास लोहकरे यांची एक मताने निवड करण्यात आली, तसेच नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी म्हणून बाळू काठे, कमल बांबळे, पुंडलिक असवले, मच्छिंद्र वाघमारे, दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे, लक्ष्मण मावळे यांची निवड करण्यात आली, तर तालुका समिती सदस्य म्हणून 23 जणांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पेकारी यांनी केले, तर समारोप नवनिर्वाचित अध्यक्ष नंदा मोरमारे यांनी केले. या अधिवेशनाचे स्थानिक संयोजन किसान सभेच्या आंबेगाव तालुका समितीने केले होते.