पुरंदरवासीय पाण्यावाचून कासावीस : फळबागा जळाल्या
बेलसर : पुरंदर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची उपसा सिंचन योजना समजल्या जाणार्या पुरंदर उपसा सिंचन योजना दि. 3 जानेवारीपासून दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि. 15) पर्यंत बंद ठेवण्यात येणार होती. परंतु, 15 फेब्रुवारी उलटून देखील अद्याप पुरंदर उपसा सिंचन योजना चालू झालेली नाही. त्यामुळे आता पुरंदरकरांना पाण्याची वाटच पहावी लागणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत? पुरंदरमध्ये तीव्र दुष्काळ पडला असल्याने आता शेतकर्यांना पाण्याची अत्यंत गरज भासत आहे.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील 14 हजार 450 दौंड तालुक्यातील 3760 तर हवेली तालुक्यातील 890 व बारामती तालुक्यातील 6 हजार 498 असे 25 हजार 498 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येते. ही योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून पाहिजे त्या प्रमाणात खर्च केला गेला नाही.
योजना सुरू झाल्यापासून एकदाही देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने ही दुरुस्ती केली गेली. पुरंदर उपसा बंद झाल्याने रब्बी पिके अडचणीत आले आहेत गहू, कांदा, हरभरा, विविध फुले, वांगी, टोमॅटो, वाटाणा, ज्वारी ही पिके अडचणीत आले आहेत. या पांण्यावर अवलंबून असणारे उसाचे पीक देखील जळून गेले आहे. परिसरात पाणी न मिळाल्याने बोरवेल व विहिरी आटल्या आहेत. यामुळे सीताफळ, डाळींब अंजिर, पेरू व इतर फळबागाही मोठ्या प्रमाणात संकटात सापडल्या आहेत.
पुढील पाण्याचे नियोजन कसे करणार?
पुरंदर तालुक्यातील लाभक्षेत्रात येणार्या गावांना योजना चालू झाल्यावर पाणीपुरवठा कशा पद्धतीने केला जाणार, कोणत्या गावाला कधी पाणी दिले जाणार, याबद्दल अनेक प्रश्न शेतकर्यांना पडत आहेत तर पुरंदरमधील सर्व लाभधारक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी जाणार असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे पुढील किती दिवस शेतकर्यांना सिंचन योजनेच्या पाण्याची वाट पहावी लागणार हाही मोठा प्रश्नच आहे.
पंप दुरुस्त करणे, नदीवरील पंपगृहातील गाळ काढणे, गळणारी पाईपलाईन दुरुस्त करणे गळणारे व गंजलेले एअर व्हॉल बदलणे तसेच जलपर्णी काढणे इतर सर्व कामे पूर्ण झाली आहेत व गाळही काढून घेतला आहे. उर्वरीत जलपर्णी काढण्याचे काम चालू आहे.शनिवारी(दी.17) मध्यरात्री आम्ही पंप हाऊस चालु करीत आहोत. टेस्टींग करुन लगेच पाणी पुरवठा सुरु केला जाईल .
– महेश कानीटकर,कार्यकारी अभियंता उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग
सध्या अति तीव्र दुष्काळामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना देखभाल दुरुस्ती साठी बंद आहे, मागे सोडलेले योजनेचे पाणी कधीच संपुण गेले आहे.आता शेतात असलेला कांदा व गहु, सीताफळ फळबागांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पुरंदर उपसा सिंचन योजना कधी सुरू होईल व शेतीला पाणी मिळेल याची वाट पाहत आहेत.
– सुरज गदादे, माजी उपसरपंच, टेकवडी