ग्रामपंचायतीने औषध फवारणी करण्याची मागणी
यवत – करोना संसर्गापासून दिलासा मिळाल्यानंतर आता यवत (ता. दौंड) मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये थंडी-तपाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने डेंग्यूचा प्रभाव कमी करण्यासाठी यवत ग्रामपंचायतीकडून स्वच्छता व किटकनाशक औषधाची फवारणी आणि धुरळणी नियमित केली जावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
जुलै ते ऑक्टोबर दरम्यान डेंग्यू सर्वाधिक पसरतो. या ऋतुमध्ये डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते,असे वैद्यकीय सूत्रांनी बोलताना स्पष्ट केले. यवत परिसरातील विविध भागात खोल खड्डे व खुली गटारे असल्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढली आहे.
गांभीर्याची बाब म्हणजे याच पाण्यात डेंग्यूच्या डासांचीही पैदास होत असल्याने संपूर्ण यवतमध्ये डेंग्यूच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. या आजारावरील उपचारासाठी सर्वसामान्य नागरिक शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे. याचा परिणाम येथील आरोग्यसेवेवर पडत आहे.आतापर्यंत पाच ते सहा रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हे करा
* खराब टायर नष्ट करा
* पाण्याची भांडी, ड्रम, रांजन झाकून ठेवा
* घरात टाक्यांना झाकणे बसवा
* मोठ्या डबक्यात डास, अळी भक्षक गप्पी मासे सोडा
* कचरा दूर अंतरावर टाका